गुरुवार, २० जुलै, २०१७

`right to privacy'

`आधार'च्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात `right to privacy' यावर खल होतो आहे. माणसाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण हा नेहमीच चर्चेत राहिलेला अन तरीही महत्व कमी न होणारा विषय आहे. या निमित्ताने यावर होणारा खल स्वागतार्ह आहे. मात्र हा खल वरवर होतो आहे, फक्त तांत्रिक पद्धतीने आणि तांत्रिक बाबींचा होतो आहे, असे वाटते. त्यावर फारसा विचार कोणी केलेला वा करताना दिसत नाहीत. काल एका वाहिनीवर चर्चा सुरु असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीने जे तर्क दिले वा युक्तिवाद केला, ते तर फारच केविलवाणे अन तर्कशून्य होते. उथळ होते. जग पुढे चालले आहे, तंत्रज्ञानाची गती खूप आहे. त्या गतीशी जुळवून घ्यावे लागेल. देशाचा विकास करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. इत्यादी. या विकास वगैरे गप्पांच्या पलीकडे आम्ही कधी जाणार?
आज आम्ही एका प्रचंड चक्रव्युहात सापडलो आहोत. आम्ही म्हणजे भारत आणि भारतीय जनता. जगातील अन्य देशांपुढे ही समस्या नाही. कारण भारतीय जीवन वेगळे आहे. एका बाजूला नीती, मूल्ये, धर्म, परंपरा, जीवनदृष्टी, जीवनासंबंधीचा विचार, अन या सगळ्याचा हजारो वर्षांचा सशक्त प्रवाह. अन दुसरीकडे गेल्या शे-दोनशे वर्षात भारताबाहेरून आलेले विचार आणि जीवनदृष्टी. यांच्या संघर्षात आम्ही सापडलो आहोत. आधुनिक ज्ञानविज्ञान, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था; या साऱ्याचा सुखकर मानवी जीवन घडवण्यातला वाटा; आणि भारतीय जीवनदृष्टी यांचा हा संघर्ष आहे. याचं आकलन कठीण निश्चितच आहे. त्यामुळे भारत, भारतीयता, भारतीय जीवनदृष्टी, आध्यात्म, वैश्विक सहजीवन, सर्वसमावेशकता इत्यादी बाबी स्वीकारणारे, मान्य असणारे सुद्धा केव्हा या साऱ्याला छेद देतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.
`right to privacy' चा विचार करतानाही हा व्यूह समोर येतो. त्यावर मंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त सूत्र म्हणून काही गोष्टी समोर ठेवतो.
स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस. हे जेव्हा कामारपुकुर या त्यांच्या जन्मगावाहून कोलकाता येथे आले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना शिक्षण घेण्याचा आग्रह केला. त्यावेळी तो आग्रह नाकारून त्यांनी भावाला उत्तर दिले- `ही केळी तांदळाची गाठोडी बांधणारी विद्या मला नको.' ते शिकले नाहीत. पैशाचा स्पर्श सुद्धा त्यांना सहन होत नसे. एकदा त्यांच्या शिष्यांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी काही नाणी त्यांच्या अंथरुणाखाली लपवून ठेवली. त्यावेळी अंथरुणावर बसताच त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांच्या शरीराची आग होऊ लागली. त्यांच्या संवेदना साधनेने एवढ्या तीव्र झाल्या होत्या की पैशाचा स्पर्श त्यांना मुळीच सहन होत नसे. एकदा तर कोळी लोकांच्या ज्या राणीने बांधलेल्या मंदिरात ते पुजारी होते तेथेच, राणी पूजा करीत असतानाही तिच्या मनात पैशाचे विचार चाललेले होते. तेव्हा त्यांनी तिच्या कानाखाली आवाज काढून ते विचार दूर सारून पूजा करण्याचा उपदेश केला होता. सांगण्याचे तात्पर्य हे की, शिक्षण, पैसा इत्यादी नाकारणे यात खूप वावगे वा वाईट काहीही नाही. आजच्या व्यवस्थेत कोणी असे करू शकेल का? प्रत्येकाने धरून बांधून या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, त्यात सहभागी झालेच पाहिजे असे म्हणणे; हा सामाजिक मर्यादांचा भंग आहे. शिक्षण वा पैसा कमावणे हा जसा अधिकार आणि हक्क आहे, तसेच ते नाकारणे हाही अधिकार वा हक्क आहे. आज तर शालेय साहित्य देण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला बँक खाते आवश्यक केले जात आहे. आध्यात्मिक साधकाची जबाबदारी समाजाने आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी पालकांनी घेणे, यात गैर काय आहे? त्यात अडचणी येतात, तर अडचणी दूर करायच्या की व्यवस्थांचा काच वाढवायचा?
राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा व्यवस्थांमध्ये सहभागी व्हायचे की नाही? व्हायचे तर किती? याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच हवे. आपल्या देशातील प्राचीन व्यवस्थांबद्दल खूप बोलले जाते. ती लवचिक नव्हती असा आक्षेप घेतला जातो. पण वास्तव काय होते? ज्यांना जातीव्यवस्था मान्य नव्हती ते ती बाजूला सारायला मोकळे होते. शीख, बौद्ध, जैन इत्यादी पंथ जातीव्यवस्था आणि त्याची बंधने न मानणारे होते. उपासना पद्धतीच्या बाबतीत असलेले स्वातंत्र्य तर सर्वपरिचित आहे. भाषा काय, भूषा काय, अनेक प्रकारची विविधता या अपार स्वातंत्र्यामुळेच निर्माण झाली. व्यक्ती जोवर विघातक कार्य करीत नाही तोवर त्याला पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. मात्र त्याचवेळी त्याची योग्य अयोग्य दृष्टी, नीती अनीती कल्पना, जीवनातील उदात्तता, उन्नत भावना- विचार यांची जाण; यांचे पोषण व्हायला हवे आणि ते काम धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक लोकांनी करायला हवे. आज परिपूर्ण स्वातंत्र्याची बाजू घेणारे चांगले-वाईट, नीती-अनीती मान्य करीत नाहीत. ज्याच्या मनात जे येईल तेच अंतिम आणि त्यासाठी स्वातंत्र्य असावे, असा त्यांचा युक्तिवाद असतो. परंतु त्याने अनवस्था निर्माण होते. दुसरीकडे सामाजिक (प्रशासकीय, राजकीय) बंधने वाढवली तर माणसाचे माणूसपण निकालात निघते. यावरचा उपाय सत्तेची मर्यादा कमी करणे आणि समाजाचा आंतरिक स्तर वाढवणे हा आहे.
भारतेतर विचार नेमका याविरुद्ध आहे. तो सत्तेची मर्यादा वाढवत जातो, माणसाला सामाजिक यंत्राचा निर्जीव भाग बनवतो; त्याचवेळी त्याच्या उदात्त-उन्नत बाजूला नाकारून, मनात येईल ते करण्यासाठी स्वातंत्र्याची मागणी करतो. आजचे न संपणारे संघर्ष त्यामुळेच आहेत. परंतु त्यावर उपाय व्यक्तीचे स्वातंत्र्य मर्यादित करणे नाही. व्यक्तीला समाजाचा एक ठोकळा मानून त्याला एक UID देणे, सामाजिक सुरक्षा क्रमांक म्हणून त्याची ओळख तयार करणे हा भयंकर प्रकार म्हणावा लागेल. त्याचे समर्थन करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करणे, त्याच्यावर जाईल तिथे लक्ष ठेवणे, त्याच्या सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवणे हे चुकीचे आहे. अशी देखरेख ठेवणारी व्यवस्था असती तर रमण महर्षी, योगी अरविंद, गोळवलकर गुरुजी, समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, मीराबाई; हे सगळे निर्माण झाले असते का? स्वामी विवेकानंद यांनी तर या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठणकावून सांगितले होते की- अशा व्यवस्थेमुळेच भारताबाहेर आध्यात्म विकसित होऊ शकले नाही. आध्यात्म बाजूस ठेवले तरीही, व्यक्तीवर पूर्ण नजर ठेवणारी व्यवस्था चुकीचीच ठरते. अशी व्यवस्था असती तर ना सावरकर काही करू शकले असते ना आणिबाणी विरुद्ध यशस्वी संघर्ष करता आला असता. माणूस हा अमृताचा पुत्र आहे, ही उपनिषदांची वाणी आहे. चारदोन सुबक गोष्टी करून दाखवणे हा काही त्याच्या जीवनाचा आशय आणि उद्देश नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक; अशा सगळ्या क्षेत्रात आज जे सुरु आहे त्यावर एकएक बिंदू घेऊन हा विषय समाजासमोर येण्याची गरज आहे. आम्ही तोंडाने जी भारतीयता बोलतो तिचा अर्थ उलगडत जाण्याची, ती नीट समजून घेण्याची आत्यंतिक गरज आहे. तूतू मीमी आणि तांत्रिक कसरती यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
सुरक्षा, दहशतवाद, भ्रष्टाचार, सामाजिक न्याय; इत्यादींचा विचार न करताच हा माणूस लिहितो की काय? असे ज्यांना वाटत असेल त्यांना वाटू द्यावे, त्यांनी तसे वाटून घ्यावे. ज्यांना तसे वाटत नाही त्यांच्यासाठी एवढेच म्हणेन- एका लेखात सगळ्याच गोष्टी येऊ शकत नाहीत. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच वरील विचार सूत्र रुपात मांडला आहे. `right to privacy' मी उचलून धरतो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २० जुलै २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा