रविवार, १६ जानेवारी, २०२२

चरखा

सध्या चरखा चरखा सुरु आहे. तो धागा पकडून मन सहज भूतकाळात गेलं. `गांधी विचारधारा' या विषयात आम्ही तेव्हा एम.ए. करत होतो. ते काही पदवी मिळवण्याचं वय नव्हतं अन त्याची गरजही नव्हती. पण गांधीजी समजून घेणे, त्यांचे विचार समजून घेणे यासाठी हा खटाटोप. तर त्यावेळी सुत काढणे हा आमच्या curriculum चा भाग होता. वर्षभर रोज तासभर सुत कातणे चालले होते. `गांधी विचारधारा'चे विभाग प्रमुख होते डॉ. गांधी. अजूनही आहेत. दक्षिणी माणूस. स्पष्ट सांगायचं तर लहरी आणि तुसडा. गांधीजींच्या संदर्भ चौकटीत न बसणारा. त्यांना कसं टाळता येईल एवढाच फक्त प्रश्न राहायचा. बाकी मजा यायची. निवांत campus मध्ये संध्याकाळी वर्ग राहत असत. त्यावेळी लोकसत्तेला असल्याने वेळ कशी जमवायची हा प्रश्न होता. पण निभले दोन वर्ष. मी पीएच.डी. करावं यासाठी डॉ. गांधी खूप मागे लागले होते. अर्थात त्यात मला डॉक्टरेट मिळावी यापेक्षा त्यांना गाईड म्हणून काही तरी करता येईल हा भाग अधिक होता. मी काही त्या भानगडीत पडलो नाही. हां, सुत मात्र मनापासून काढले. धागा तुटायचा वारंवार. तो पुन्हा जोडायचा. पुन्हा कातणे सुरु. भरपूर सुत कातलं होतं. त्याचं करायचं काय? त्याचा प्रश्नही विभाग प्रमुखांनी सोडवला होता. ते सुत देऊन खादीचं कापड घ्यायचं. ती व्यवस्था त्यांनीच केली होती. मग मी कातलेलं सुत देऊन खादीचं कापड घेतलं होतं. अन ते पिल्याला दिलं होतं सलवार कमीज साठी. पिल्याने त्या कापडाचा ड्रेस शिवून वापरला पण होता. आठवतं का पिल्या? त्यावेळी लिहिलेल्या `गांधीजींची पत्रकारिता' या लघु प्रबंधाचं पुस्तक करता येऊ शकेल. काही तरी विचार करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

१७ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा