सोमवार, २४ जानेवारी, २०२२

दळभद्री युग

माझा संगणक गेली तीन चार महिने नादुरुस्त होता. अखेरीस सुरू झाला. मध्यंतरी बीएसएनएल फोन बंद केला. कारण त्याचा उपयोग नव्हता. शिवाय फोनवरील नेट संगणकाला जोडण्याचे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तेच वापरू हा विचार. इथवर ठीक. आज संगणक सुरू करून नेट जोडल्यावर -

- नवीन वापरकर्ता असल्याने लॉगिन व्हायला नकार. (का बाबा? तुझं काय जातं, मी या डिव्हाईस वरून लॉगिन करीन नाही तर त्या. तुला काय करायचं? मला माझ्या सुरक्षेची अजिबात चिंता नाही. माझे अब्जावधी रुपये कोणी चोरले किंवा मला मारून टाकलं तरी माझी हरकत नाही. पण माझ्या भल्यासाठी म्हणून तू मलाच वेठीला का धरतोस? शिवाय देशाची सुरक्षा वगैरे आहेतच. कोणीतरी एखादा किंवा मूठभर काही करतील म्हणून तुम्ही त्रास भोगला पाहिजे. तुम्हाला काहीही किंमत नाही. तुम्हाला काहीही अर्थ नाही. तुम्ही सज्जन असून उपयोग नाही. तुम्ही फक्त कठपुतली. जगायचं असेल तर गुलाम होऊन जगा नाही तर मरा. या युगाची ऐसीतैसी.)

- संगणक बंद पडणे हा माझा दोष आहे का?

- service provider बदलणे हा गुन्हा आहे का?

- फोनवर चालणारं नेट संगणकावर का विनात्रास चालू नये?

- कोणाच्या बा चं काय जातं?

बरं कसंबसं काही सुरू केलं आणि गेली १०-१२ वर्ष लिहिण्यासाठी जे google transliteration वापरीत होतो ते download करायचा प्रयत्न केला. ते दाद द्यायला तयार नाही. अति विद्वान, महान, सर्वज्ञ गुगल ला हजारदा transliteration सांगूनही ते आपलं translation कडे नेऊन सोडत होतं. आता गुगल ची अक्कल संपली की काही कायदे बियदे भानगड आहे ठाऊक नाही. बरं पैसे हवे असतील तर ते सांगावं. तेही नाही. अन हे म्हणे user friendly.

- तंत्रज्ञान कधी वापरायचं, कसं वापरायचं, हे ठरवण्याचा; ब्रेक घेऊन पुन्हा वापरण्याचा पर्याय हवा की नको. हे करताना सुरक्षितता किंवा बदल यांचा जाच होऊ नये एवढी अपेक्षा सुद्धा अनाठायी असू शकते का?

- एक मात्र खरं की आपण एका दळभद्री युगात जगतो आहोत. एक तर 'चालतच' म्हणून दात विचकत पुढे जायचं किंवा अडचणींवर मात वगैरे करण्याची षंढ तत्त्वज्ञाने पाजळायची. हजार पर्याय समोर ठेवले जातील पण बाबा रे - मला तुझ्या त्या हजारो पर्यायात आपला वेळ वाया नाही घालवायचा. मला माझ्या मर्जीने साधं सोपं जगता यायला हवं. त्यासाठी काही सांग नाही तर *** जा.

- श्रीपाद कोठे

२५ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा