गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्वातंत्र्याचा परीघ

जीवन आणि जीवनयापन यावर संकट येत नाही तोवर कोणाच्याही स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आपल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली अन्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे अयोग्यच ठरते. सध्या कोणती एक ब्रिगेड शनीशिंगणापूर मंदिर प्रवेशासंबंधी जे करते आहे ते म्हणूनच सर्वथैव अयोग्य आहे. महिलांना भेटायचे की नाही हा शनिदेवाचा अधिकार नाही का? कोणीतरी शनिदेवाचे प्रतिनिधी म्हणून न्यायालयात यासाठी दाद मागावी. (अन मी हे थट्टेने म्हणत नाही.) शनीचे दर्शन हा कोणाच्याही जीवन वा जीवनयापनावर गदा आणणारा मुद्दा नाही. त्यामुळे त्याला सध्या आलेले रूप निखालस चुकीचे आहे.

या ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत जे राजकारण खेळले तेही दुर्लक्षित करण्यासारखे नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी केवळ पदरात पाडून घेतली नाही तर त्यांनी आपल्यासोबत सपत्नीक त्या चौथऱ्यावर यावे अशी मागणी केली आहे. जर उद्या या ब्रिगेडला चौथऱ्यावर जाण्याची परवानगी मिळालीच तरीही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे म्हणून काही स्वातंत्र्य आहे की नाही? कदाचित त्यांना ब्रिगेडची भूमिका मान्य नसेल तर? (पंकजा मुंडे यांनी ही भूमिका मान्य नसल्याचे स्पष्टच म्हटले आहे, हे लक्षात घ्यावे.) कदाचित भूमिका मान्य असूनही अशा राजकारणात किंवा आंदोलनात्मक इत्यादी समाजकारणात त्यांना पडायचे नसेल तर? अन अशा एखाद्या कारणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जाण्यास नकार दिला तर? तर पुन्हा हा `ब्राम्हणी'पणा असल्याच्या बोंबा ठोकल्या जाणार नाहीत कशावरून? एकूणच `पुरोगामी' लोकांच्या चाळ्यांचा इतिहास पाहता असे वाटणे अनाठायी नाही.

यावर गांभीर्याने विचार करू इच्छीणार्यांनी प्रथम आपल्या देशातील पंथनिर्मितीचा नीट विचार करावा.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा