शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

आंगण - आंदण

'हे विश्वाचे आंगण

आम्हा दिले आहे आंदण'

'चाफा बोलेना' गाण्यातील एक ओळ. किती खोल आणि अर्थपूर्ण. हे विश्वाचे आंगण आम्हाला आंदण दिले आहे. आंदण पालकांनी द्यायचं असतं. हे विश्वाचं आंगण आम्हाला कोणी दिलं? कोणी ईश्वर म्हणेल, कोणी प्रभू, कोणी आणखीन काही. कोणी म्हणेल, माहीत नाही बुवा. उत्तर काहीही असलं तरी एक सत्य नाकारता येत नाही की, हे विश्वाचं आंगण आमचं नाही. आम्ही फक्त विश्वस्त आहोत, देखभाल करणारे आहोत. मालक नाही.

एकदा हे सत्य मान्य केलं की त्याची अनुभूती होण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अन मग सगळं आकलन आणि दृष्टी बदलून जाते. मग शेतीवाडी, घर, भूखंड आपले असूनही आपले नसतात. देश आदी गोष्टींचंही तसंच. असं होणं हा एक जीवनसोहोळा असतो. एवढंच नाही तर 'चांगल्या जगाचं' स्वप्न अधिकाधिक पूर्ण होण्याचा, निकोप मानवी संबंधांचा आधारही या आंदणाची अनुभूती हाच असू शकतो.

जग असं मानत नाही. भारताचा मात्र हा हजारो वर्षे जुना विचार आहे. भारताला भारत करण्याचा, भारतीय माणसाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न याच आधारावर झाला. हे जगाला सांगणे, शिकवणे, भारतासहित जगभर रुजवणे; हेच भारताचे प्रयोजन देखील आहे. हां, तो प्रथम आपल्या विश्वासाचा आणि अनुभूतीचा भाग, आमच्या अस्तित्वाचा घटक मात्र व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २२ जानेवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा