बुधवार, १९ जानेवारी, २०२२

प्रेम, जीवन, मृत्यू

सुनंदा पुष्कर यांचा आकस्मिक आणि अनैसर्गिक मृत्यू सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सुनंदा या देशाच्या एका मंत्र्याची पत्नी असल्याने ती चर्चा आणखीनच चविष्ट वाटते आणि आपल्या शत्रू देशाच्या एका महिला पत्रकाराचेही नाव त्या प्रकरणात आल्याने ही चविष्ट चर्चा खमंग झाली आहे. त्याच्या राजकीय आणि जागतिक बाजू ज्या असतील त्या असोत, पण त्याची मानवीय बाजूही आहे. ही मानवीय बाजू आहे प्रेमाची. सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांचा प्रेमविवाह झाला होता. तोही वयाच्या पन्नाशीत आणि हा दुसरा विवाह. म्हणजेच आकर्षण, अल्लड प्रेम वगैरे नाही. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील जे काही ताणतणाव वगैरे असतील तो काही सार्वजनिक विषय होऊ शकत नाही, होऊ नये. पण या दुसर्या विवाहाने त्यांचं व्यक्तिगत जीवन नक्कीच सुरळीत झालं असावं. म्हणजेच प्रेमाने त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. दुर्दैव म्हणजे हे प्रेमच त्यांच्या मृत्यूचे कारणही ठरले. सुनंदा यांनी आरोप केल्याप्रमाणे त्यांचे पती शशी थरूर आणि पाकिस्तानी महिला पत्रकार यांचे प्रेम संबंध असोत वा नसोत, पण सुनंदा यांनी त्याबाबत एवढ अस्वस्थ होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं पतीवरील प्रेम. आपल्या पतीचं मन दुसर्या महिलेसाठी धडकू नये ही स्वाभाविक अशी प्रतिक्रिया आहे. यालाच स्वामित्व म्हणतात. प्रेम हे अशा प्रकारे स्वामित्व गाजवीत असते. दुसरी शक्यता आहे की हा त्यांचा केवळ संशय असावा. पण संशयी होणं हीसुद्धा आत्यंतिक प्रेमाचीच एक प्रतिक्रिया नाही का? याचाच अर्थ- शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार यांचे प्रेमसंबंध असतील तरीही किंवा नसतील तरीही; सुनंदा यांची त्यावरील प्रतिक्रिया ही त्यांच्या मनातील प्रेमाचेच द्योतक आहे. प्रेमातील हे स्वामित्व वा संशय हा जातपात, धर्मपंथ, वय, लिंग, भाषा, देश, आर्थिक वा सामाजिक पुढारलेपण किंवा मागासलेपण काहीही पाहत नाही. संबंधित माणसाची मूळ वृत्ती, वातावरण आणि परिपक्वता यानुसार स्वामित्व वा संशय यांचे परिणाम वेगवेगळे राहू शकतात एवढेच. काय गंमत आहे नाही- एकच प्रेमाची भावना विश्वास आणि समर्पण यांना धरून येते तेव्हा जीवनाला अर्थ देते आणि तीच प्रेमाची भावना स्वामित्व आणि संशयाचा हात धरते तेव्हा यमराजाशी हातमिळवणी करते. जीवन देणारं प्रेमच मृत्यूही देऊन जातं.

- श्रीपाद कोठे

२० जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा