सोमवार, १७ जानेवारी, २०२२

`एक टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती

आधुनिकता अथवा आधुनिक विचारांचा हा परिणामही आहे अन पराभवही. सगळ्यांना सगळं काही देण्याच्या तोंडाच्या वाफा कितीही दवडल्या तरीही साध्य शून्य. सगळ्यांना सगळं काही देण्याचा `खोटा ढोंगीपणा' करत अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न म्हणजे आधुनिकता. पैसा, रोजगार, शिक्षण यांची सार्वत्रिकता आधुनिकतेने संपवली आहे. जुन्या समाजरचनेने अन्याय केला, पैसा, रोजगार, शिक्षण यापासून वंचित ठेवले याचा जेवढा कंठशोष केला जातो तो फुकाचा आहे. ती-ती कामे करणाऱ्या समाजगटाला पैसा, रोजगार, शिक्षण याची शाश्वती होती. आजच्यासारखी परवड नव्हती. हां, तीन गोष्टी होत्या ज्यांचा विचार व्हायला हवा होता. केलाही जात होता. १) व्यवस्थेतील परिवर्तनाचा अभाव. कोणाला बदल करायचा असेल तर त्यासाठी वाव नसणे. २) श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भाव. ३) अन्याय आणि अत्याचार. मात्र या बाबींचा शांतपणे विचार न करता सगळ्या त्रासासाठी जुन्या व्यवस्थेला बोल लावून जाणीवपूर्वक ती नासवण्याचेच उद्योग करण्यात आले. त्याच्या मुळाशी असलेला सर्वकल्याणी भाव आणि `माणूस' नावाच्या प्राण्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास यांची अवहेलना करण्यात आली. यालाच महात्मा गांधीजी म्हणाले होते- dont throw baby with bathwater. या साऱ्याचा समग्र साधकबाधक विचार ज्यांच्याकडून अपेक्षित आहे ते सगळे (सगळ्या व्यक्ती आणि सगळे गट) फक्त आणि फक्त politically correct काय आहे याचाच विचार आणि उच्चार करतात.

याच विषयाशी संबंधित एक बिंदू. त्यावर पुन्हा केव्हा तरी लिहेन. बिंदू हा की, वेद, उपनिषदे, पुराणे किंवा ब्रम्हज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचू दिलं नाही यावर मोठा आक्षेप होता आणि आहे. तो रास्तही आहे. पण आज हे सगळं भांडार खुलं झालं असताना ते ग्रहण करण्याची जिज्ञासा आणि लालसा किती आहे?

- श्रीपाद कोठे

१८ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा