बुधवार, २६ जानेवारी, २०२२

एक आठवण

हे फोटो पाहताना भूतकाळ आठवला. बहुतेक १९७९ किंवा १९८०. नागपूरचा रक्षाबंधन उत्सव चिटणीस पार्क मैदानावर होता. त्यावेळी आणिबाणीनंतर काही राज्यांमध्ये जनता पार्टीची सरकारे होती. मध्यप्रदेशात सुद्धा जनता पार्टीचे सरकार होते. त्या सरकारातील कारागृह मंत्री पवन दिवाण त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस उपस्थित होते. कार्यक्रम सुरु झाला. वैयक्तिक गीत झालं. पवन दिवाण यांचं भाषण सुरु झालं आणि पाचच मिनिटात श्रावणधारा बरसू लागल्या. श्री. दिवाण यांनी मागे वळून पाहिलं. बाळासाहेबांनी हातानेच थांबू नका अशी खुण केली. जवळपास अर्धा तास त्यांचं भाषण झालं. नंतर स्व. बाळासाहेब पाउण तास बोललेत. त्यांच्या बौद्धिकाच्या शेवटाला पाउस उघडला. प्रार्थनेसाठी उत्तिष्ठ आज्ञा झाली तेव्हा अनेकांना चिखलातून उठवण्यासाठी हात द्यावे लागले होते. प्रार्थना वगैरे आटोपली. पण ध्वज ओला होऊन ध्वजस्तंभाला चिकटून बसला होता. मग दोऱ्या सोडून ध्वजस्तंभ उतरवला आणि ध्वज काढला होता. विकीर नंतर सगळे हाहाहुहू करत होते.

- श्रीपाद कोठे

२७ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा