रविवार, २ जानेवारी, २०२२

समाजजीवन भारून टाकू

मारुंजीचा `शिवशक्ती संगम' पाहत होतो. वैयक्तिक गीत सुरु झालं. कानावर शब्द आले- `समाजजीवन भारून टाकू, चैतन्याने मानाने... वैभवशाली भवितव्याला नटवू नीज कर्तृत्वाने...' अन अनेक बिंदू क्षणार्धात जोडले गेले. १९८६ साली नाशिकला पश्चिम क्षेत्राचा द्वितीय वर्षाचा संघ शिक्षा वर्ग झाला होता. त्याच्या समारोपाला गायलं गेलेलं हे गीत. नागपूरच्या शिक्षार्थी स्वयंसेवकांचा गट घेऊन तिघे जण गेलो होतो. श्याम पत्तरकिने, विजय खळतकर आणि मी. त्याच वर्षीच्या नागपूरच्या हिवाळी शिबिराची गोष्ट. शिबीर सुरु झालं त्याच दिवशीची. बौद्धिक कार्यक्रमासाठी संपत झालं. अन कर्ण्यातून आवाज आला- `महेशजी कोठे (म्हणजे आम्हीच- खाजगीत लोक महेश म्हणून ओळखतात. अन संघात माझ्यासारखाही सहज `जी' होतो.) त्वरित मा. मोहनजींना भेटतील. गेलो. भेटलो. मा. मोहनजी म्हणाले- नाशिकला झालेलं `समाजजीवन भारून टाकू' आपण मकर संक्रांतीसाठी शाखांना देणार आहोत. एकदा मला म्हणून दाखवायचं आणि शिबिरात सगळ्यांचा अभ्यास घ्यायचा. अस्मादिकांनी म्हणून दाखवलं. अन मग शिबीर संपेस्तोवर प्रत्येक बौद्धिक कार्यक्रमापूर्वी `समाजजीवन...'चा अभ्यास झाला. आज मा. मोहनजी प.पू. सरसंघचालक आहेत. त्यांच्यासमोर १९८६ च्या शिबिरात मी गीत म्हटलं तेव्हा तिसरं कोणीच नव्हतं. आज त्यांच्यासमोर तेच गीत गायलं गेलं तेव्हा दीड लाखाहून जास्त स्वयंसेवक पूर्ण गणवेशात होते.

काय वाटलं सांगता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा