मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

विवेकानंद जयंतीचे चिंतन

आज पौष कृष्ण सप्तमी. स्वामी विवेकानंद यांचा तिथीनुसार जन्मदिन.

स्वामीजींना कोटी कोटी प्रणाम.

या क्षणी तीन गोष्टी विशेषत्वाने जाणवतात.

१) स्वामीजींनी कधीही महापुरुषांचे अनुकरण करा, त्यांचे विचार अमलात आणा, त्याविना तरणोपाय नाही; इत्यादी सांगितलं नाही. त्यांनी महापुरुषांचे अनुकरण करायला नव्हे, तर महापुरुष व्हायला आवाहन केलं. याला अगदी ते स्वत: आणि त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांचाही त्यांनी अपवाद केला नाही. त्यांचे हे आवाहन सत्याच्या साक्षात्कारावर आधारलेले होते. म्हणूनच महापुरुष होण्याचे त्यांचे आवाहन, सुविचारप्रसूत भंपक चांगुलपणा आणि स्वार्थप्रसूत छद्मीपणा यांच्यातून वाट काढत, सत्यदर्शनाचा मार्ग अधिक प्रशस्त आणि प्रकाशित करते. त्यामुळेच त्यांना जर-तर, पण-परंतु करावे लागत नाही. ते स्वच्छपणे सांगतात- या विश्वात अनेक सापेक्ष सत्य आहेत. निरपेक्ष सत्य मात्र एकमेव आहे. दोन्हीची गल्लत करू नका. या विश्वाचा भोवरा, त्याचे एकसंध स्वरूप आणि तरीही त्यातील खालची पायरी अन वरची पायरी, त्यातील डावे नि उजवे, त्यातील सकस नि हिणकस हे सगळं स्वच्छपणे आणि स्पष्टपणे समजावून ते महापुरुष होण्याचं आवाहन करतात. आहोत तिथेच, आहोत तसेच राहा अन बाह्य गोष्टींचे आधार शोधत राहा हे त्यांना मान्य नाही. बाह्य आणि आंतरिक अशा दोन्हीचं व्यवस्थापन करून वर वर चढा आणि सर्वव्यापी सर्वोच्चता प्राप्त करून घ्या हाच त्यांचा संदेश आहे. राजयोगावरील व्याख्यानातील यासंबंधीचे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात- `प्रत्येक जीव अव्यक्त ब्रम्ह होय. ते स्वरूप प्राप्त करून घेणे हाच जीवनाचा अर्थ. ज्ञान, भक्ती, योग, कर्म यापैकी एकाचा, अनेकांचा वा सगळ्यांचा उपयोग करून ते स्वरूप प्राप्त करून घ्या आणि दुविधापूर्ण स्थितीतून मुक्त व्हा.' खरा माणूस होण्यासाठी सुद्धा हे `माणूस'पणाच्या पलीकडील स्थितीचे अनुसंधानच मदत करेल. त्याविना माणूस होण्याचे प्रयत्न सुद्धा विफल होतील.

२) स्वामीजींचे भारतप्रेम. भारत हा त्यांचा श्वास होता. पण भारत म्हणजे काय हेही त्यांनी सिद्धहस्तपणे सांगितले. भारताला भारत म्हणून समजून घ्या हे त्यांचे आवाहन. भारतबाह्य सत्ता, संपत्ती आणि अन्य मापदंड लावून भारताचे मुल्यांकन करू नका. त्यांनी तयार केलेल्या संदर्भ चौकटीत भारताला कोंबू नका आणि त्यांनी दिलेल्या फुटपट्ट्या वापरून भारताला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. त्याची originality आणि अपूर्वता ओळखा. त्यावर प्रेम करा. भारताचे खरे स्वरूप हा तुमचा श्वास होऊ द्या. हा त्यांचा दुसरा महत्वाचा संदेश.

३) हिंदुत्वाला आक्रमक करणे, हा तर त्यांच्या जीविताचा हेतूच होता. त्यांनी स्वत: तो अनेकदा स्पष्ट केलेला आहे. हां, पण `हिंदुत्वाला' आक्रमक करणे. हिंदुत्वाला इस्लामत्व किंवा ख्रिश्चनत्व असे स्वरूप देणे नव्हे. हिंदुत्व हे अगदी मूळ, शुद्ध, कसदार, सुवर्णासारखं लखलखित हिंदुत्व. त्याला फक्त आक्रमक करणे.

स्वामीजींच्या जन्मतिथीचे शुभचिंतन.

- श्रीपाद कोठे

१९ जानेवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा