शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

स्वरसहवास

`स्वरसहवास'मध्ये अलीकडे बरीच अस्वस्थता होती. अन आज तर तिचा अक्षरश: स्फोट झाला. नेमही हातात हात घेऊन बागडणारे गंधार आणि पंचम उदास असल्याने आज एकमेकांकडे पाहतही नव्हते. किंवा निषाद आणि षड्जाची रोजची दंगामस्ती दूरच, साधे तोंडही उघडले जात नव्हते. काहीतरी खास नक्कीच होते. आजचा दिवसच तसा होता. `रागरागिणी सहवास' सोबत `स्वरसहवास'ची आज महत्वाची बैठक होती. आमच्याशी वागताना दुजाभाव अन भेदभाव केला जातो, असा `स्वरसहवास'च्या रहिवाशांचा `रागरागिणी सहवास'च्या रहिवाशांवर आरोप होता. जसे ते श्री. मालकौंस. काय समजतात स्वत:ला कोणास ठावूक? आमच्या रिषभ आणि पंचमशी कधीच बोलत नाहीत. कधी त्यांची विचारपूस नाही. त्यांना जवळ सुद्धा येऊ देत नाहीत म्हणजे काय? हा अन्याय आहे सरळसरळ. किंवा ते श्री. मेघ. कधी म्हणजे कधीही आमच्या गंधार आणि धैवताला त्यांच्या दारापुढून देखील जाऊ देत नाहीत. इतका तिरस्कार बरा आहे का? घेतलं एखादे वेळी जवळ. दिला थोडा खाऊ. निदान विचारलं एका शब्दाने- कारे बाबा कसा आहेस? बरा आहेस ना? पण नाही. हा अपमान आहे, अन्याय आहे, दुस्वास आहे. अन अपमान सहन करणे यासारखे पाप नाही. या प्रश्नाचीच तड लावायची आहे. त्या न्यायाधीश महोदयांनी तर हात वर केलेत. म्हणाले- तुमचे तुम्ही पाहा. त्यामुळे आज समोरासमोर बसून सोक्षमोक्ष लावायचा आहे. म्हणूनच `स्वरसहवास'मध्ये तणाव आहे. काय होईल कसे होईल याच चिंतेत सगळे चूर आहेत. `रागरागिणी सहवास'च्या रहिवाशांनी नाही मानलं तर त्यांना जबरदस्तीने मानायला लावायचे हा `स्वरसहवास'च्या रहिवाशांचा निर्धारच आहे. सरळ बोलणे ऐकले तर ठीक. नाही तर रागरागिण्यांच्या घराघरात घुसण्याची अन तेही जमू न शकल्यास त्यांच्यावर चक्क बहिष्कार टाकण्याची तयारी `स्वरसहवास'च्या रहिवाशांनी चालवली आहे.

- श्रीपाद कोठे

२९ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा