गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

प्रश्नसंस्कृती

आज प्रबोधिनी एकादशी. प्रबोधन करण्यासाठी नाही (कारण ती माझी औकात नाही), तर स्वत:च्या प्रबोधनासाठी काही मुद्दे. फक्त सगळ्यांसोबत शेअर करतो आहे.

- सगळं जग नवीन युगात प्रवेश करतं आहे. त्यात आपणही आहोत.

- या नवयुगासाठी विचारक्रांती अपरिहार्य आहे.

- आपल्या हाती फक्त त्याला प्रतिसाद देणे आहे.

- त्या विचारक्रांतीसाठी उपनिषदांच्या प्रश्न संस्कृतीचं पुनरुज्जीवन हवं.

- पत्रकारी, वकिली, पोलिसी, बुद्धिवादी, राजकीय, विज्ञानी, साम्यवादी प्रश्न संस्कृतीचं मात्र नको.

- आजच्या विविध प्रश्न संस्कृती तयार उत्तरे सिद्ध करण्यासाठी प्रश्न करतात. त्यांची उत्तरे तयारच असतात. फक्त ती सिद्ध करणे हा हेतू असतो.

- किंवा उत्तर मिळालं नाही की चूक वा बरोबर ठरवतात. उत्तर न मिळणे म्हणजे चूक नाही.

- तयार उत्तरे, चूक वा बरोबर ठरवणे अथवा वर्चस्व सिद्ध करून काही तरी पदरात पाडून घेणे; या दोषांनी आजच्या प्रश्न संस्कृती बाधित आहेत.

- उपनिषदांची प्रश्न संस्कृती या सगळ्या दोषांपासून दूर आणि तरीही यांच्यापेक्षा अधिक थेट, अधिक प्रखर, अधिक तेजस्वी आहे. ती प्रश्नकर्त्याला स्वत:लाही प्रश्न करण्याचं बळ देते. ती तत्त्वदर्शनी, सत्यान्वेषी आहे.

- अमुक एखाद्या गोष्टीला, व्यक्तीला, तत्त्वाला, विचाराला, कृतीला, गटाला, जातीला, स्त्रीला, पुरुषाला; ती प्रश्नापासून दूर राहण्याचा विशेषाधिकार देत नाही. तरीही ती आजच्या प्रश्न संस्कृतीहून आगळी आहे. ती प्रश्नाच्या यादीत प्रश्नकर्त्याला पहिल्या स्थानावर ठेवते. त्यामुळेच ती आगळी असूनही अतिशय कठीण आहे.

- ही उपनिषदी प्रश्न संस्कृती पुनरुज्जीवित व्हायला हवी. ती युगांतराची गरज आहे.

- १९ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा