रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

रियांग



२२ नोव्हेंबर २०१८

येत्या आठ पंधरा दिवसात होणाऱ्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत ब्रू निर्वासितांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून त्याची सगळी तयारी झाल्याची बातमी आज वाचली. खूप बरं वाटलं. ब्रू म्हणजे रियांग जमातीचे वनवासी. गेल्या शतकाच्या नव्वदीच्या दशकात मिझोराम आणि त्रिपुरा यांच्या सीमावर्ती भागात वास्तव्य असलेल्या रियांग लोकांवर त्या भागात सक्रिय असणाऱ्या ख्रिश्चन शक्तींनी अनन्वित अत्याचार केले. अन मिझोराममधील सगळ्या रियांग लोकांना पळवून लावले. रात्रीच्या रात्री गावेच्या गावे पेटवून दिली. मिझोराममधील हे रियांग लोक त्रिपुरात निर्वासित म्हणून आले. सहा निर्वासित शिबिरात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्रिपुरातील कांचनपूर येथे साधारण आठवडाभर मुक्काम करून त्यातील चार शिबिरांना भेटी देऊन त्यांच्यावरील विपदा आणि तो प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो सगळाच प्रकार फार भयानक होता. ख्रिश्चनांच्या क्रूर विकृतीचं एक उदाहरण एका म्हाताऱ्या व्यक्तीने सांगितलं होतं. जीवाने मारून टाकणे ही काही फार मोठी गोष्ट नव्हतीच. पण कोणाच्या तरी मनात राक्षसी वृत्ती जागी झाली आणि त्यांनी त्या म्हाताऱ्याला त्याच्या चार-पाच वर्षांच्या नातवाचे शव हातावर घेऊन अख्खी रात्र जंगलातून चालायला लावले होते.

त्यावेळी लोकसत्तात होतो. परंतु लोकसत्तेचा एकही पैसा न घेता, स्वत:चे पैसे खर्च करून गेलो होतो. जाताना बोलून गेलो होतो की, मला काहीही नको. फक्त सुट्टी द्या आणि आल्यावर त्यावर लिहीन ते योग्य वाटल्यास प्रसिद्ध करा. अर्थात योग्य याचा अर्थ लोकसत्ताच्या भूमिकेशी जुळणारं. मी नेहमीच माझ्या पद्धतीने लिहित आलो आहे. ते लोकसत्तेला पसंत पडलं नाही. कारण त्यात ख्रिश्चन आतंक, बांगलादेशातील धागेदोरे इत्यादी विषय होते. त्यामुळे ते सगळे अप्रसिद्ध राहिले. पण सुमारे दोन-अडीच दशकांनी आज रियांग लोकांना पुन्हा मतदानाचा अधिकार मिळाल्याचे वाचले तेव्हा बरं वाटलं.

(टीप- अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे हे वाचताना मनात येऊ देऊ नयेत. कारण संघ स्वयंसेवकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची पद्धत आपल्या देशात पूर्वी नव्हती.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा