सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

शेतीबद्दलची कृतघ्नता

दोन वाक्ये अनेकदा कानी पडतात.

१) आपला देश शेतीप्रधान आहे, तरीही शेतीकडे दुर्लक्ष केले जाते.

२) शेतीवरील भार कमी करायला हवा.

प्रश्न असे निर्माण होतात की-

१) देश शेतीप्रधान आहे म्हणून शेतीकडे लक्ष द्यायला हवे का?

२) शेतीवरील भार कमी करायचा म्हणजे शेती कमी करायची का?

३) शेतीकडे केवळ रोजगार निर्मितीची क्षमता याच दृष्टीने पाहणे योग्य आहे का?

४) सेवा आणि उत्पादन क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करून शेतीवरील सगळा रोजगार त्यात सामावून घेतला तर ते किती योग्य ठरेल?

५) मुळात शेतीकडे पाहण्याची दृष्टी काय असावी?

खरे तर देश शेतीप्रधान असो की नसो, माणसांना खायला लागणारच आणि खाण्याची व्यवस्था शेतीशिवाय होऊच शकत नाही. आज जगात डझनावारी देश असे आहेत ज्यांच्याकडे स्वत:ची शेती नाही. त्यांना पूर्णत: दुसऱ्या शेती उत्पादकांवर अवलंबून राहावे लागते. प्रगती, तंत्रज्ञान, आधुनिकीकरण कितीही झाले तरी पोट सुटत नाही आणि निसर्गावर मात करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही पोटाला लागणारी भूक संपत नाही. त्यामुळेच चंद्र-मंगळावर वसाहती वसवल्या तरी शेतीला पर्याय नाही. शेतीची ही मुलभूतता लक्षात घेऊन शेतीचा विचार व्हायला हवा. ती अन्य गोष्टींपैकी एक नाही. अन्य गोष्टी असल्या वा नसल्या तरी चालू शकणारे आहे. शेतीशिवाय चालूच शकणार नाही. आपण सगळ्यांनीच शेतीबद्दलची कृतघ्नता टाकून देण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२३ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा