रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

कलाचिंतन

'भारतीय संगीताची लोकप्रियता वाढविण्यासाठी ते गतिमान आणि rhythmic करावे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ते अकारण गतिमान करून गोंधळ करू नये.'

प्रसिद्ध मोहनवीणा वादक पंडित विश्वमोहन भट्ट यांनी नागपूरला हे मत व्यक्त केलं. यासाठी पंडितजींचे आभार आणि त्यांना धन्यवाद.

खरं तर आज संगीत किंवा कला एवढेच नाही तर सगळ्या क्षेत्रात असं मूलभूत आणि स्पष्ट बोललं, सांगितलं आणि ऐकलं जाण्याची गरज आहे. परिस्थितीचा रेटा, लोकांची आवड, बदललेली मूल्य, आधुनिकता या किंवा अशा labels नी विचारांचा, व्यवहाराचा जो भोंगळपणा सुरू आहे तो थांबायलाच हवा. परिस्थितीनुसार बदलायला हवे वगैरे जी भंपकगिरी तोंडावर फेकण्याची आणि झेलण्याची सवय झालेली आहे तीही बदलायला हवी. सखोल, साधकबाधक, निरक्षिर विचारांची सवय लागायलाच हवी. आमच्या समजुती, गोंजारावे वाटणाऱ्या अनेक गोष्टी यांना धक्के बसले; त्या गोष्टी मोडल्या, कोसळल्या तरी हरकत नाही.

समग्र विचार न केल्याने सगळेच कसे चुकत जाते आणि किती विविध बाजू असतात हेही पं. भट्ट यांनी सांगितलेल्या एका किस्यातून स्पष्ट होते. किस्सा असा - अमिताभ बच्चन यांनी रेकॉर्ड केलेली रवींद्रनाथांची रचना पं. भट्ट यांनी ऐकली. तेव्हा ते बच्चन यांना म्हणाले की, अमितजी तुम्ही अगदी सुरात गायलात. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले की, मी बेसुरा आहे पण ट्यून तंत्रज्ञानाने ते सुरात केले आहे.

हा किस्सा कलेचे कमअस्सलपण, उथळपण, पैशाचे अयोग्य वितरण, अस्सल कला आणि कलाकार अडगळीत जाण्याची प्रक्रिया, व्यक्ती आणि समाज यांची घसरण आणि दुर्गती, वेडपट वृत्ती या सगळ्या बाबींवर प्रखर प्रकाश टाकतो. आम्हाला ते समजतं का हा कळीचा प्रश्न आहे. आज मनोरंजन उद्योग म्हणून जे काही सुरू आहे त्याचाही उल्लेख जाताजाता करायलाच हवा. मनोरंजनाच्या विविध माध्यमातून जे अर्थकारण चालतं, त्याने एकूणच किती नुकसान आणि अन्याय होतो आहे यावर आपण कधीतरी बोलणार की नाही; की फक्त 'परस्परं प्रशंसंती अहो रुपम अहो ध्वनिम' असंच चालणार आहे?

- २१ नोव्हेंबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा