शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

राजकीय पक्षांचे झेंडे




(४ नोव्हेंबर २०१३)

       Shripadji Kothe, आपल्या या लेखातून नेहमी प्रमाणे आपल्याला कोणता मुद्दा जनमानसात ठामपणे रुजवायचा आहे, हे स्पष्ट होत नाही.        खरं पाहता भगव्या रंगाचा संबंध फक्त त्याग भावनेशी आहे. त्यासाठी संघाचा प.पू. ध्वज भगवा निवडला गेला. त्याचा म्हणजे भगव्या रंगाचा आपण लावल्याप्रमाणे अन्वय लावणे हे व्यर्थ शिणवणुक आहे. 

Shrikant Gondhalekar, मला काहीही रुजवायच वगैरे नाही. मला फक्त लोकांनी विचार करावा एवढंच सुचवायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेत `नेहमीप्रमाणे' असा शब्द वापरला आहे, त्याचा उलगडा होत नाही.

नेहमीप्रमाणे फक्त येवढ्यासाठी म्हटलं कि आपल्याला आपल्या लेखातुन एखादा मुद्दा जोरकसपणे मांडावचा असतो पण या लेखांत असा एकही मुद्दा मला सापडला नाही एवढेच, कृपया गैरसमज नसावा म्हणुन मुद्दाम खुलासा केला आहे. Ok?


@Shrikant Gondhalekar, मला वाटतं तुमचा गोंधळ होतो आहे आणि तुमच्या मनात असलेलं तुम्हाला मांडता येत नाहीय. एक तर तुम्ही म्हणता `मला काय मांडायचे असते ते माझ्या लेखात सापडत नाही'. मुळात हे गमतीशीर विधान आहे. मीच नाही जगातला कोणीही लेखक (अगदी तुम्ही लिहिलंत तर तुम्हीही) आपल्याला जे म्हणायचं तेच मांडत असतो. हां, हे खरं की ते वाचकाला पटेल, रुचेल, भावेल, मानवेल असं नाही. वाचकाची काही अन्य अपेक्षा असू शकते आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही असं वाचक म्हणू शकतो. पण ती वाचकाची समस्या आहे. लेखकाची नाही. लेखक वाचकाची अपेक्षा मनात ठेवून लिहित नाही. दुसरे म्हणजे लिहिलेलं असंबद्ध वा अनाकलनीय असू शकतं. पण मला वाटतं अजून तरी माझं तसं झालेलं नाही. तिसरा भाग म्हणजे, आजवर कधीही माझ्या लिखाणातील एखाद्या मुद्यावर तुम्ही स्वत:चं मत व्यक्त केलेलं नाही. एखादा मुद्दा पटला, आवडला किंवा काही मतभेद वगैरे व्यक्त केले नाहीत. तसे केले तर सार्थक चर्चा होऊ शकते. पण तुमची प्रतिक्रिया ही sweeping comment स्वरुपाची आहे. शक्यतो अशा प्रतिक्रिया टाळाव्या. चवथा मुद्दा भगव्याचा. एखादी गोष्ट जेवढी जुनी तेवढे त्याचे अर्थही अनेक आणि भिन्न भिन्न असतात. त्यामुळे संदर्भ समजूनच चर्चा होऊ शकते. एकाच अर्थाचा आग्रह पूर्णत: एकांगी व चुकीचा आहे. रा.स्व. संघाचा भगवा ध्वज हा जसा एक पैलू आहे तसेच अन्यही पैलू आहेत. पराक्रम हाही एक पैलू. पण यातील एकही पैलू एकमेव नाही. सध्याच्या स्थितीत त्याला एक राजकीय पैलूही प्राप्त झाला आहे. तुम्ही किंवा मी `हो' किंवा `नाही' म्हणून वास्तव बदलत नाही. जग असंख्य गोष्टींच्या क्रिया प्रतिक्रियांनी चालत असते. सध्या देशात सर्वत्र राजकीय चर्चा सुरु आहेत आणि मीदेखील राजकीय संदर्भातच माझं मत मांडलं आहे. `भगवा रंग धारण केल्याने किंवा हिंदुत्व मान्य केल्याने तुम्ही धर्मनिरपेक्ष राहत नाही' हा जो युक्तिवाद अन्य राजकीय पक्ष वा तथाकथित बुद्धिवंत करतात, तो कसा निरर्थक आहे हेच त्यातून सुचवायचे आहे. झेंडा हिरवा असल्याने जर ते पक्ष हिंदुविरोधी म्हणता येणार नाहीत तर मग हिंदुत्व वा राम मंदिर म्हटल्याने भाजप, संघ, विहिंप धर्मनिरपेक्ष नाहीत, असे कसे म्हणता येईल; हा त्यातील गर्भित अर्थ आहे. अन्य पक्ष वा विचारांसाठी ती एक मेख आहे. यालाच between the lines असे म्हणतात.

@Shrikant Gondhalekar, या निमित्ताने आणखीन एक मुद्दा- जो अधिक व्यापक आहे. आपण भारतीय प्रबोधन परंपरा सुद्धा नीट समजून घ्यायला हवी. उपनिषदे किंवा भगवदगीता हे भारतीय प्रबोधन परंपरेचे मानदंड आणि मापदंड आहेत. आणि भगवदगीतेत सगळं सांगून झाल्यावरही श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटी हेच सांगतो, की बाबारे- तू तुझा विचार कर आणि योग्य ते कर. उपनिषदांनीही मतांची, दर्शनांची, विचारांची विविधताच उचलून धरली आहे. प्रत्येकाने विचारशील व्हावे, प्रत्येकाने तत्वज्ञ व्हावे, प्रत्येकाने ब्रम्हज्ञ व्हावे हेच भारतीय हिंदू परंपरेला अभिप्रेत आहे. विचारांचा साचा अथवा मी म्हणतो तेच अंतिम हे आपल्या परंपरेला मान्यच नाही. मी म्हणतो ते सत्य असलं तरीही ते तू पारखून घे. डोळे मिटून मानू नकोस, हेच भारतीय हिंदू चिंतन आहे. त्यामुळे माझ्या लेखनातून असा एकांगीपणा येत नसेल तर मला आनंदच आहे.

******

भगवा हा देशाचा रंग आहे असे म्हणायला काही हरकत नाही. तसे तर सगळेच रंग आपलेच आहेत, पण भगव्याचे वैशिष्ट्य आहे हे कोणी नाकारणार नाही. भगवा रंग म्हणजे हिंदू असेही समीकरण तयार झाले आहे. आपल्या देशातील अनेक पक्षांपैकी भारतीय जनता पक्ष हा हिंदूंचा पक्ष समजला जातो. तो हिंदुत्ववादी म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी असा समजला जातो. आपल्या देशात जेवढे पक्ष आहेत त्यातील भाजप वगळता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पक्षाच्या ध्वजातच फक्त भगवा रंग आहे. त्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचीच नक्कल केली असल्याने त्यात भगवा आहे. हिंदुत्व वगैरेशी त्यांचं काही देणंघेणं नाही. ते पक्ष स्वत: हिंदुत्व नाकारीत असले तरीही त्यांच्या ध्वजात योगायोगाने म्हणा, नाईलाजाने म्हणा भगव्याचा समावेश आहे. शिवाजी महाराजांमुळे मनसे भगवा टाळू शकत नाही. शिवसेना तर बोलून चालून हिंदुत्वाची पुरस्कर्ती. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा ध्वज भगवा आहेच.

परंतु बाकीचे जे पक्ष आहेत त्यांच्या मनात तर नाहीच पण ध्वजातही भगवा नाही. कम्युनिस्ट तर रक्ताचा लाल रंग खांद्यावर घेऊनच नाचत असतात. मुख्य म्हणजे जनता दल (संयुक्त)- नितीशकुमार यांचा, राष्ट्रीय जनता दल- लालूप्रसाद यादव, बिजू जनता दल- नवीन पटनाईक; यांचे ध्वज फक्त हिरव्या रंगाचे आहेत. समाजवादी पक्षाचा ध्वज लाल व हिरव्या रंगाचा आहे. अ.भा. अण्णा द्रमुकचा ध्वज लाल व काळ्या रंगाचा, द्रमुकचाही लाल व काळ्या रंगाचा, तेलगु देसम पार्टीचा पिवळ्या रंगाचा त्यात लाल चक्र असलेला, असे आहेत. मुस्लीम लीगचा तर स्वाभाविकच हिरवा आहे. या सगळ्या पक्षांना या देशातील ८० टक्के जनतेशी काहीही घेणेदेणे नाही, असे म्हणायचे की ते ८० टक्के हिंदूंच्या विरोधात आहेत असे म्हणायचे की ८० टक्के हिंदूंचे शत्रू आहेत असे म्हणायचे?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा