रविवार, २३ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (११)

जसा भक्तिमार्ग आध्यात्मिक विकास रोखून ठेवू शकतो अन कधीकधी आध्यात्मिक अधोगतीला नेऊ शकतो; तसेच कर्म, योग, ज्ञान हे मार्ग देखील आध्यात्मिक विकास रोखू शकतात आणि आध्यात्मिक अधोगतीला नेऊ शकतात. राजस वृत्ती असल्यास कर्माला प्राधान्य आणि महत्व दिले जाते. खूप काम, स्वार्थाला तिलांजली आणि परहितासाठी झटणे; या तीन गोष्टी कर्मयोगाची प्रमुख अंगे म्हणता येतील. अशा कर्मयोगी व्यक्तींचे अध्यात्माचे अवधान सुटले की, ते workoholic होण्याची शक्यता असते; स्वार्थशून्यता अभिमान होऊन जाते; अन परहितासाठी झटताना साधनशुचिता इत्यादी सुटून जाऊ शकते. जणू काही आपण काही काम केले नाही तर हे जग थांबून जाईल की काय असा त्यांचा पवित्रा असतो. हे जग चालवण्याची जबाबदारी आपल्याला दिलेली नसून ती अचिंत्य शक्ती आपल्या माध्यमातून काम करते आहे, याचा विसर पडतो. अशा व्यक्तीत कर्तेपणाचा भाव वाढीस लागतो. काम करण्यासाठी त्यांची तगमग होते. शारीरिक स्थिती, परिस्थिती, साधने यांच्या मर्यादांनी ते अस्वस्थ होतात. इतकेच नाही तर आपण हाती घेतलेल्या कामाचा एकांगी विचार करून अन्य कामांविषयी मनात अन्यथा भाव बाळगतात. आपण काम केले नाही, कार्य केले नाही तर कसे होईल अशी चिंता त्यांना सतावते. ही चिंता अनाठायी आहे असे त्यांना सांगितल्यास रागही येतो. आपण एखादे कार्य करून दाखवले, त्या कार्याने अमक्या लोकांचे असे असे भले केले; याचाही आनंद आणि अभिमान निर्माण होतो. अशा कामांना, कार्यांना आध्यात्मिक म्हणता येणार नाही. आपण आपले काम करत राहावे, देवाला एक नमस्कार पुरेसा असतो; अशी अतिशय उथळ भाषा प्रसंगी वापरली जाते. वास्तविक देवाला एका नमस्काराचीही गरज नसते. परंतु एक नमस्कार पुरेसा असतो म्हणताना आपण आणि आपले काम याबद्दल जी श्रेष्ठत्वाची भावना मनात असते ती आध्यात्मिक नसते. Work is worship, कार्य हीच उपासना; असं तोंडाने म्हणताना; मनात मात्र work is almighty, कार्य हाच ईश्वर; असा भाव असतो. ईश्वराचे कार्य या आध्यात्मिक भावाऐवजी कार्य हाच ईश्वर असा भाव येतो. अन कार्य करणारे आपण असल्याने नकळत आपण ईश्वराहून मोठे होतो. हळूहळू हे मोठेपण अशा व्यक्तीला व्यापून टाकते. विशेषतः त्याच्या कार्यात त्याला यश मिळत असेल वा मिळाले असेल तेव्हा.

आपल्या कार्याबद्दलच्या अतिरेकी कल्पना, आपल्या कार्याबद्दलचे ममत्व हाही मोठा अडथळा असतो. कोणत्याही परिस्थितीत, कशाही पद्धतीने कार्य पूर्ण व्हायलाच हवे; असा आग्रह धरला जातो आणि मग योग्य अयोग्य विवेक न करता; युक्त्याप्रयुक्त्या आणि तडजोडी केल्या जातात. पैसा, सत्ता, कायदे, नीती, नियम, तत्त्व; हे सगळे आपल्या सोयीने ठरवले जाते. नकळत का होईना व्यक्तीचा नसला तरी संस्थेचा, संघटनेचा स्वार्थ वरचढ होतो. अनेक प्रकारच्या खटपटी, लटपटी केल्या जातात. कामाचे दृश्य स्वरूप, कामाचे यश, कामाचे मोजमाप; या गोष्टींना प्राधान्य मिळते. अन याच बाबी संदर्भ आणि मूल्यांकन यासाठी लक्षात घेतल्या जातात. व्यक्तिगत सांसारिक बाबींपासून मोठाल्या सामाजिक वा सेवाकार्यांपर्यंत सगळ्याच कामांना, कार्यांना हे लागू होऊ शकते. साधा सांसारिक कर्ममार्गी किंवा सामाजिक कर्ममार्गी दोघांतही ही लक्षणे आणि दोष दिसू शकतात, असू शकतात. असा कर्मयोग आध्यात्मिक असण्यापासून खूप दूर असतो.

आपले कार्य, कार्याची प्रेरणा, कार्याचे परिणाम, कार्याचे कौशल्य, कार्याची साधने, कार्याचे यश वा अपयश, अन कार्य करणारे आपण स्वतः; हे सारेच ईश्वरीय प्रसाद असून; ईश्वरार्पण भावाने केले पाहिजे; असा विचार ओतप्रोत भरून राहतो आणि तो वागण्याबोलण्यातून प्रत्ययाला येतो; तेव्हा तो कर्मयोग आध्यात्मिक म्हणता येईल. अन्यथा या जगातील अनेक प्रकारच्या चढाओढीचाच तो एक भाग होऊन जाईल.

कर्मयोग आचरताना आणखीन एक शक्यता असते. आपले स्थान घट्ट धरून ठेवण्याची वृत्ती. आपल्या स्थानाला गोचिडीसारखे चिकटून बसण्याचा हट्ट. घरात वा संस्थेत वा सामाजिक कार्यात लोक आपली जागा, आपले पद, आपले स्थान, आपला हुद्दा सोडायला तयार नसतात. समाजाचीही मानसिकता अशीच असते की; अगदी शेवटल्या श्वासापर्यंत माणसाने काम करत राहावे, पदावर राहावे. स्वतःहून किंवा परिस्थितीनुसार, वयानुसार कोणी बाजूला झाला तर वेगवेगळ्या चर्चा होतात. एखाद्या व्यक्तीचे असे बाजूला होणे समाजाला रुचत नाही. अनेकदा तर अशा गोचिड वृत्तीच्या व्यक्ती अडचणीच्या होऊन बसतात. श्री रामकृष्ण परमहंस त्यांच्या विशिष्ट शैलीत म्हणत असत - 'कोणती भाजी करायची यातून सुद्धा मन निघत नाही अन म्हणे देव पाहिजे.' कर्मयोग आचरताना महत्वाचे असलेले detachment जोवर येत नाही तोवर त्या कर्माला आणि त्याचे आचरण करणाऱ्याला आध्यात्मिक कसे म्हणायचे? व्यावहारिक जगात काही मर्यादा निश्चितच येतात. जसे भाषेच्या मर्यादा. माणसाला 'मी' 'तू' या भाषेतच बोलावे, वागावे लागते. कार्य करताना कोणी दुखावला जाऊ शकतो, सगळ्यांचे समाधान शक्य होत नाही, नीती अनीती यावर एका मर्यादेपलीकडे नियंत्रण शक्य नसते. या सगळ्याचा दोष कर्म करणाऱ्याला लागणे स्वाभाविक असते. त्यासाठीच मर्यादित कार्य आणि ईश्वरार्पण बुद्धीने कार्य हा उपाय सांगितला जातो. कमळाचे पान जसे पाण्यापासून, चिखलापासून अलिप्त राहते तसे; कार्य करीत असूनही त्यापासून अलिप्त राहणे; ही कर्मयोगी माणसाची कसोटी असते. ('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा