रविवार, ३० मे, २०२१

एकात्म मानववाद (२)

 

एकात्म मानववाद हे सनातन धर्माच्या, सुदीर्घ भारतीय चिंतन परंपरेच्या वृक्षावर फुललेले सुंदर फूल आहे. हे जर जीवनदर्शन आहे, सनातन भारतीय चिंतन परंपरेचाच जर हा आविष्कार आहे तर त्याला `वाद’ का म्हटले असेल? हा विचार एखाद्या वादापुरता सीमित आहे का? तसा तो सीमित होऊ शकेल का? या मुद्यावर स्व. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात- `एकात्म मानववाद’ का नाम `वाद’ या `इज्म’ क्यों रखा गया? वैसे पंडितजी स्वयं `वाद’ के पक्षपाती कभी भी नहीं थे. उनका मत था की जो सत्य और सनातन है, न तो वह वाद के चौखटे में ठीक बैठेगा और न बदलती हुई परिस्थितियों का मुकाबला कोई वाद कर सकेगा. दुसरे शब्दों में वाद या इज्म कभी भी सभी देशों के लिए और समस्त कालों के लिए उपयोगी नहीं हो सकता. यही उनकी भावना थी. यही उनकी दृष्टी थी. किंतु आज कुछ लोगों की आकलनशक्ति की भी एक सुनिश्चित पद्धति बन गयी है और यह पद्धति वाद या इज्म की है. अत: सर्वसाधारण की सुविधा के लिए वाद अथवा इज्म शब्द का प्रयोग पंडितजी ने किया.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर) यामुळेच १९८० च्या दशकापासून रा. स्व. संघ आणि (भारतीय जनता पार्टी वगळता) संघप्रेरित अन्य संघटना, विशेषतः वैचारिक क्षेत्रात काम करणारे लोक, `एकात्म मानववाद’ याऐवजी `एकात्म मानवदर्शन’ असा शब्दप्रयोग करू लागले आहेत.
आपण ज्या मार्गाने आजवर चालत आलो त्याने लोक, समाज, राज्य, यंत्र या सगळ्यात एक संघर्ष उत्पन्न केल्याचे रोज पाहायला मिळते. यातील प्रत्येक घटकाची ओढाताण, प्रत्येक घटकाला कमी वा अधिक महत्व- स्थान- प्राधान्य- प्रमाण- यामुळे जन्माला येणारे दु:ख, अस्वस्थता, उद्रेक, असमाधान, अशांती; आज नवीन राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर `एकात्म मानववाद' लक्षणीय ठरतो. हा सार्वत्रिक संघर्ष आणि असमाधान दूर करण्यासाठी; प्रत्येक घटकाचे महत्व, स्थान, प्राधान्य, प्रमाण; कमी वा अधिक होऊ नये हे आवश्यक आहे. परंतु हे कमी आहे की अधिक आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निर्णय कसा करायचा? त्यासाठी हवी दृष्टी. ही दृष्टी विकसित होण्यासाठी हवा ठोस विचार. असा विचार आकारास येण्यासाठी हवे तत्वज्ञान आणि असे तत्वज्ञान सिद्ध होण्यासाठी हवे जीवनाचे दर्शन. असे जीवनाचे दर्शनच या सगळ्या धावपळीला दिशा देऊ शकते. `एकात्म मानववाद' हे असे दिशा देणारे दर्शन आहे.
काय सांगते हे दर्शन?
१) आत्यंतिक व्यक्तिवाद नको.
२) आत्यंतिक समूहवाद नको.
३) पैशाचा अभाव नको तसेच पैशाचा प्रभावही नको.
४) संघर्षाऐवजी समन्वयाची कास धरावी.
५) राजकीय सत्ता सर्वोपरी आणि सर्वेसर्वा नाही.
६) माणूस हा आर्थिक, राजकीय वा सामाजिक प्राणी नाही.
७) माणूस हा शारीरिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यासोबतच मानसिक, बौद्धिक व आत्मिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यांनी संचालित होत असतो.
८) माणूस हा ठोकळा वा यंत्र नाही. (यंत्रवाद म्हणताना दीनदयाळजींना यंत्रांचा अतिरेक नसावा हे जसे अभिप्रेत होते तसेच माणूस हा यंत्र नाही; किंबहुना हे विश्व म्हणजे चार भाग जोडून बनवलेले यंत्र नाही हेही अभिप्रेत होते. विचार आणि दृष्टीतील यांत्रिकता हा यंत्रवाद याचा आशय.)
९) मानव हा या विश्वापासून वेगळा isolated नाही. माणूस, समाज, निसर्ग, ब्रम्हांड, अन या सगळ्याचे मूळ जे काही असेल ते; या सगळ्यांचा समन्वय सुखासाठी आवश्यक. सगळ्यापासून फटकून अथवा सगळ्यावर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीतून सुखी होता येणार नाही.
१०) उच्च प्रेरणांच्या अभावी मानवी जाणिवांचा आणि प्रेरणांचा विकास अशक्य. अन या विकासाअभावी सुखशांतीपूर्ण सहअस्तित्वाकरीता माणूस सहकार्यही करणार नाही.
११) विचार आणि चेतनेचा विकास झालेला माणूस. नराचा नारायण होण्याचा ध्यास घेतलेला माणूस. त्याच्या आधारे मर्यादांची जाण असणाऱ्या व्यवस्था. सामूहिक पुरुषार्थाच्या आधारे या व्यवस्थांच्या द्वारे सगळ्यांचे संपूर्ण सुख.
१२) यासाठी अनुकूल जीवनशैली.
एकात्म मानववादाचे हे काही ठळक पैलू. यांच्यावर एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेचच स्पष्ट होते की, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता यांची यातील भूमिका मर्यादित आहे. ती मुलभूत आहे असेही नाही. हा समाजाने समाजासाठी करावयाचा विचार आहे. ही समाजाने स्वत:साठी स्वीकारावयाची दिशा आहे. राजकीय सत्तेला वेठीला धरून व्यक्ती वा समाजाच्या इच्छांची आवर्तने पूर्ण करण्याचा खटाटोप किंवा व्यक्ती व समाजाच्या इच्छांच्या आवर्तनांचा उपयोग करून घेत सत्ता बळकट करण्याचा उपद्व्याप; असे `एकात्म मानववादाचे' स्वरूप नाही. एकात्म मानववाद हजारो वर्षांच्या मानवी संचितातून निघालेले नवनीत काय आहे याचा मार्ग आणि दिशा स्पष्ट करतो. त्यासाठी सत्ता, पक्षोपपक्ष यांच्यासोबतच समाजाकडूनही विशिष्ट गुणांची, कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची, समजूतदारीची अपेक्षा करतो. readymade tailored सुखाचा दावा एकात्म मानववाद करीत नाही. खोट्या आणि फसव्या कल्पना आणि दावे तो मोडीत काढतो. तो ना आशावादी आहे ना निराशावादी. एकात्म मानववाद यथार्थवादी आहे. तो डावा किंवा उजवा नाही, तर सरळमार्गी आहे. तसेच तो केवळ भारतासाठी नाही तर समस्त मानवतेसाठी आहे.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'एकात्म मानववाद काय आहे?' या प्रकरणातील एक अंश.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा