मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

रोहित वेमुला आणि विवेकानंद

रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या सध्या गाजते आहे. त्यावरून सुरु असलेले राजकारण तर घाणेरडे आहे. समाजातील उपेक्षित वर्गाला चांगले जीवन मिळावे यासाठी सुरु झालेल्या शे-दीडशे वर्षातील चळवळींनी राजकारणाच्या वळचणीला जाऊन आपले सत्व आणि स्वत्व गमावले आहे. दलित चळवळीचेही तसेच झाले आहे. दुर्दैवाने विविध कारणांनी कोणी याबद्दल नीट विचार करायला तयार नाही. समाज, देश आणि राष्ट्र यांच्या दृष्टीने हे घातक आहे. रोज अनेक आत्महत्या होतात. नापिकी, कर्ज, आजार, प्रेम, ताणतणाव अशा अनेक गोष्टी. त्यातील एकाही घटनेचे समर्थन करता येणार नाही. पण आत्महत्या ही काही rarest of rare अशी बाब नाही. पण एखादी आत्महत्या राजकारणाच्या तावडीत सापडली की तशी होऊ शकते. रोहित वेमुला याच्या घटनेचेही तसे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्हे तसेच ते असावे अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळेच त्या संदर्भात काही लिहिले बोलले तर आकाशपाताळ एक केले जाऊ शकेल. तरीही त्याच्याशी संबंधित अशा एका मुद्यावर मत व्यक्त करावेसे वाटते.

रोहित वेमुला याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी व्यक्त केलेली मते सध्या सोशल मीडियात फिरत आहेत. ती अतिशय चुकीची अन अपरिपक्व अशी आहेत. एवढेच नव्हे तर स्वामीजींबद्दल वापरलेली भाषाही योग्य नाही. चार-पाच दिवसांपूर्वी एका व्यक्तीने अशाच प्रकारची पोस्ट टाकली होती. एवढेच नव्हे तर त्यावर लोकांनी तशाच असभ्य अन पोरकट प्रतिक्रिया दिल्या होत्या. एकाने तर स्वामीजी ignorant (अज्ञानी- त्याच्या मनातील भाव मूर्ख) असल्याचे म्हटले होते. यावरून शंका येते की, तथाकथित पुरोगामी लोकांनी आता स्वामी विवेकानंद यांना टार्गेट करण्याचे ठरवलेले आहे.

ही शंका बळकट करणारी एक घटना काल रात्री अनुभवली. संघ परिवारातील एका संघटनेच्या एका हिंदी भाषी कार्यकर्तीचा काल रात्री फोन आला. तिला एक मराठी लेख हिंदीत भाषांतरित करून द्यायचा होता. लेख स्व. गोविंद पानसरे यांच्याबाबतीत होता. तिला जी काही अडचण होती त्याबद्दल बोलणे झाल्यावर मी म्हटले- स्व. पानसरे यांच्यावरील लेख एक हिंदुत्ववादी कार्यकर्ती भाषांतरित करून देते हीही एक गंमतच. त्यावर ती म्हणाली- हो गंमत तर खरी. पण मला (म्हणजे तिला) या लोकांबद्दल आदर आहे. कारण या लोकांनी जनतेच्या भल्याचीच काळजी केली. त्यावर मी म्हणालो- हे ठीक आहे. अन हा ज्याच्या त्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे. घडलेल्या घटना योग्य तर नाहीतच. अगदी जे लोक मारले गेलेत त्यांच्याबद्दल मनात राग असेल तरीही `काळ सोकावतो' ही भीती तर आहेच. त्यामुळे अट्टल गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती सोडली तर कोणालाही या घटना चुकीच्याच वाटतात. त्यात मीही आहे. पण त्यामुळे या डाव्या अथवा कथित पुरोगामी व्यक्ती वा कामांबद्दल फार भारावून जावे असे काही नाही. मग त्या कार्यकर्तीला काही तपशील, घटना, प्रसंग सांगितले. तेव्हा ती म्हणाली- बापरे, असे आहे?

एवढे पाल्हाळ सांगण्याचा हेतू हाच की, सामान्य माणूस वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात अडकून आपली विचारशक्ती गमावून बसत असतो. गेली अनेक दशके हाच बुद्धीभ्रमाचा खेळ सुरु आहे. असंख्य उदाहरणे देता येतील. शास्त्रीय संगीतावर चर्चा करताना- `या संगीताने पोट भरते का?' असा प्रश्न उपस्थित करून बुद्धिभ्रम करणे हाच या मंडळींचा खेळ असतो. आता त्यांनी त्यासाठी विवेकानंद निवडले असल्याची शंका घ्यायला जागा आहे.

अर्थात यात नवीन काहीही नाही. स्वामीजी हयात असताना, एवढेच काय त्यांचे शिकागो भाषण झाल्यावर काहीच महिन्यात; त्यांची वाढती लोकप्रियता अन त्यांनी उभे केलेले वैचारिक आव्हान पाहून त्यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अन विषारी प्रचार खुद्द अमेरिकेत सुरु झाला होता. भारतातही त्याची री ओढणारे होते. मात्र त्या साऱ्याला स्वामीजी पुरून उरले होते. एवढेच नव्हे तर त्यानंतर तब्बल अडीच वर्षे त्याच अमेरिकेत अन युरोपात हिंदुत्वाच्या कामाची भक्कम पायाभरणी करून आले होते. आज तर पाणी खूप वाहून गेले आहे. स्वामीजी वा त्यांचे विचार यांना देण्यात आलेली वा दिली जाणारी वा दिली जाऊ शकतील; अशी कोणतीही गंभीर आव्हाने उरलेली नाहीत. त्या विचारांची चर्चा, छाननी, विश्लेषण पुरेसे झाले आहे अन पुढेही काळानुरूप होत राहील. पण या विचारांमुळे ज्यांचा ज्यांचा पाया हादरतो, ज्यांचे ज्यांचे स्वार्थ प्रश्नांकित होतात ते असले पोरकट अन असभ्य प्रकार करीत राहणार. त्यापासून सावध तर राहायला हवेच, पण त्याला चोख उत्तर देण्यासाठी अन सकारात्मक प्रतिपादनासाठी स्वामीजींचा अधिकाधिक अभ्यास करायला हवा. नुसते `अरे'ला `कारे' पुरेसे ठरणार नाही.

खूप वर्षांपूर्वी एक मराठी नाटक पहिले होते. नाव आता आठवत नाही. मानवी जीवनाचे वाढते व्यापारीकरण हा विषय होता. त्यात एक कंपनी आपला खप वाढावा यासाठी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न कसा करते हे दाखवले होते. अन ही भांडणे व्हावी यासाठी स्वत: ती कंपनीच कारस्थान रचित असते. रोहित वेमुला याच्या आत्महत्येमागेही असे कारस्थान असू शकेल का? सगळ्या अंगांनी विचार तर व्हायलाच हवा ना?

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १९ जानेवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा