सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

कावेबाज कायदा

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकावरील गदारोळात मुख्य मुद्दा कुठेतरी बाजूला पडत आहे. या विधेयकाचा तपशील, त्याच्या तांत्रिक बाजू आणि त्याला अनुसरून शब्दावली यावरून मते मतांतरे असू शकतील. पण त्यातील भावनेला आणि त्या प्रयत्नांना कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. हिंदूंनी तर नाहीच नाही. चमत्कार दाखवल्याशिवाय `संत' पदवी मिळत नाही ही ख्रिश्चन परंपरा आणि पद्धती आहे. हिंदू नाही. चमत्कार हा हिंदू धर्माचा पायाही नाही आणि ते योग्यही नाही. योगशास्त्रात चमत्कार नाकारलेले नाहीत. पण हे चमत्कार (ज्याला सिद्धी म्हणतात- अष्टसिद्धी) हे आध्यात्मिक साधनेतील, ईश्वर दर्शनाच्या मार्गातील धोंड असून त्याज्य आहेत, असाच स्पष्ट निर्वाळा आहे. त्यामुळे हिंदूंना वाईट वाटण्यासारखे काही नाही.

मुख्य मुद्दा वेगळाच आहे. तो आहे, तथाकथित विचारवंत आणि पुरोगामी यांची अप्रामाणिकता. सध्याच्या वातावरणात आमचा धर्माला विरोध नाही वगैरे म्हणायचे आणि मग कायद्याच्या चिंध्या फाडत पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, आधुनिकता यांचे ढोल बडवत किंचाळत सुटायचे. हा केवळ आरोप नाही तर त्यांचा इतिहास तसाच आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार शिकवले, योग शिकवला, संस्कृत शिकवले, भगवद्गीता शिकवली की यांचा कलकलाट सुरु होतो. मागे सरस्वती पूजनावरून केवढे गळे काढले होते. आणि खोटारडेपणाला तर सीमाच नाही. गांधी हत्येचे सत्य बाहेर येउन, दोषी- निर्दोष निर्णय होऊन, युगं लोटली आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनी निकाल देऊन झाले आहेत. पण अजूनही निर्लज्जपणे तोच खोटारडा राग आळवणारे हेच नतद्रष्ट आहेत. या प्रयत्नात न्यायालयांचा आपण अपमान करतो आहोत. फुले आंबेडकरांचे नाव घेत आपण घटनेच्या विरुद्ध वागत आहोत वगैरे कशाचीही पर्वा न करणारे हेच आहेत. आम्ही हळू आवाजात किंवा शांतपणे बोलतो म्हणजे आमचे बरोबर असे होत नाही. अनेकदा अन्यायापोटी आवाज चढतात आणि मतलबीपणापोटी आवाज सौम्य व भाषा मवाळ राहू शकतात. हा कायदा योग्य असला तरी हा कावेबाजपणा सगळ्यांनी ओळखला पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा