सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

सामाजिक परिवर्तनाची पद्धत

`त्रिवार तलाक' अवैध घोषित होऊन २४ तास होऊन गेले आहेत. पहिला भर ओसरला आहे. म्हणूनच एका गोष्टीकडे लक्ष वेधायला हवे की, हा विजयोत्सव न होता आनंदोत्सव राहावा. सामाजिक परिवर्तन हा अनेक मिती आणि पदर असलेला विषय. अगदी सामाजिक सुधारणांनी माणूस सुखी होतो का? या मुलभूत प्रश्नापासून सुधारणा केल्या नाहीत तर समाज अस्तित्वात राहू शकेल का, इथपर्यंत त्याचा पसारा असतो. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे- सामाजिक परिवर्तनाची पद्धत. एकाने जिंकल्याची भावना बाळगणे आणि दुसऱ्याने हरल्याची भावना बाळगणे दोन्हीही गैर. तसे शब्दप्रयोग, तसा आवेश आणि अभिनिवेश, वातावरण, विश्लेषण, समर्थन किंवा टीका; असे सारेच त्यात येते. सामाजिक परिवर्तनाच्या अयोग्य पद्धतींचे परिणाम आपण भोगलेले आहेत, भोगत आहोत. जातींचा प्रश्न हा त्यापैकी एक. या ठिकाणी एक आठवण होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर प्रकरणात निकाल दिला तेव्हा रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की, हा कोणाचा जय किंवा पराजय नसून, एक समस्या सुटण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. `त्रिवार तलाक'वर सुद्धा अशीच संतुलित भूमिका सगळ्या समाजाची असली पाहिजे. `कशी जिरवली? किंवा आता तुम्ही बाजी मारली, पुन्हा पाहून घेऊ.' अशा दोन्ही भूमिका टाळणे/ तयार होऊ न देणे आवश्यक आहे. सामावून घेण्याच्या या देशाच्या स्वभावाचे विस्मरण होऊ नये, एवढेच.

- श्रीपाद कोठे

२३ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा