शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

या विकृतांना वठणीवर कसे आणायचे?

आपल्या समाजाला कौतुकाची खूप घाणेरडी सवय लागली आहे आणि राजकारण नामक गोष्टीने सारा समाज नासवून टाकला आहे. आज पुन्हा हे आठवायचे कारण म्हणजे डीजे नावाचा प्रकार. प्रत्येकाला कधी ना कधी हा त्रास सोसावा लागतोच. आम्ही करू मात्र काहीच शकत नाही. तीन-चार तास ज्यावेळी सतत कानठळ्या बसत असतात त्यावेळी करायचे काय? कायदा गाढव असतो म्हणतात ते काही खोटे नाही. अमुक वेळेत तुम्ही डीजे वाजवू शकता. म्हणजे त्या वेळेत कोणाला त्रास होऊ शकत नाही की काय? की त्या वेळेतील त्रास निमूटपणे सहन केलाच पाहिजे? बरे या प्रकारात आनंद काय असतो देवच जाणे. अन समजा माझ्यासारख्या मूर्खाला तो आनंद समजत नसेल वा तो लुटता येत नसेल तरीही, मला त्रास देऊन आनंद साजरा करण्याची परवानगी कोणाला कशी काय असू शकेल? अनेकदा तर समाजातील तथाकथित प्रतिष्ठीतच या प्रकाराशी संबंधित असतात. `जाऊ द्या ना' अशीच त्यांची भूमिका असते.

वास्तविक कोणाच्या तक्रारीची वगैरेही वाट न पाहता कारवाई करण्याचे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना द्यायला हवेत. अन ज्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाईल त्या ठाण्यातील अधिकाऱ्याचीच त्वरित बदली करायला हवी. म्हणजे ते स्वत:हून efficiently काम करतील. दुसरे म्हणजे हे साहित्य काही कोणाच्या घरात नसते. बहुतेक वेळा ते भाड्याने आणलेले असते. हा व्यवसाय करणाऱ्यावरच ही कारवाई व्हायला हवी. त्याने सामानच ठेवले नाही तर कोण वाजवणार डीजे. जेव्हा डीजे नव्हते तेव्हाही मंडप डेकोरेशनवाले होतेच ना?

अशा प्रकारची गाणी तयार करणारे, म्हणणारे, वाजवणारे, असे चित्रपट, असे studio या सार्यांवर बंदी घालून कारवाई करायला हवी. यांना दुसरा काही रोजगार नाही मिळाला अन ते मेले तरी काय हरकत आहे. जो दुसऱ्याचा विचार करायला नकार देतो तो जिवंत असल्यापेक्षा मेलेलाच बरा. घर हलवणारे, डोके बधिर करणारे हे गाणे बजावणे बंद व्हायलाच हवे. घरे हलवणाऱ्या गाण्यांपेक्षा मने डोलवणारे संगीत हवे. आजचे गीतकार, संगीतकार ते देऊ शकत नसतील तर त्यांनी मरून जावे. आणि समाजानेही काय पोसायचे आणि काय संपवायचे याचा विवेक शिकला पाहिजे. स्वत:च्या कौतुकाच्या आरत्या ओवाळून घेणे समाजानेही टाकून द्यायला हवे.

ज्यांनी कारवाई करायला हवी ते आणि त्रास सोसूनही तो निमूट सहन करतात ते षंढ आहेत तर दुसऱ्यांचा विचार न करणारे विकृत आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व प्रकारचं पाप वाट्याला आलं तरीही चालेल पण अशा विकृतांचं तळपट व्हावं, कधीही भलं होऊ नये, त्यांच्या अंगात किडे पडावे आणि मेल्यावर त्यांनी नरकात जावं याशिवाय दुसरं काहीही म्हणता येण्यासारखं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा