फेसबुकवर `चव्हाटा' नावाचा एक ग्रुप आहे. गेल्या शुक्रवारी १५ फेब्रुवारी 
रोजी `संघ समजून घेताना' या शीर्षकाने एक लेख मी त्यावर टाकला. (हा लेख 
नेटवर अन्यत्रही टाकला आहे.) त्यावर स्वाभाविकच प्रतिक्रियाही आल्या. आता 
प्रतिक्रिया म्हटल्यावर काही समर्थनाच्या येणार तर काही विरोधाच्याही. 
त्यात नवीन काहीच नाही. गेली २० वर्षे लेखन करीत असल्याने ते सवयीचे आहे. 
`चव्हाटा'वर आलेल्या प्रतिक्रिया मात्र खोडसाळ होत्या. त्यातील आशय आणि 
शैली पाहून हा खोडसाळपणा स्पष्ट होत होताच. तरीही त्याला उत्तर दिले. 
अर्थात हे उत्तर खरमरीत असेच होते. त्याचाच एक लेख होईल एवढे विस्तृतही 
होते. त्यावरही पुन्हा प्रतिक्रिया आली. त्यावरून संबंधितांना विषय समजूनही
 घ्यायचा नाही आणि नीट चर्चाही करायची नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्या 
लिखाणाची आणि लिहिणाऱ्याची थोडीबहुत टिंगलटवाळी करून आणि काही तडाखे लावून 
मी विषय संपविला.
आज (सोमवार, १८ फेब्रुवारी) त्यावर पुन्हा 
प्रतिक्रिया दिसल्या. यावेळी झुंडशाही सुरु झाली होती. मी मुद्देसूद दिलेले
 उत्तर दुर्लक्षित करून काहीतरी इकडतिकडचे भारुड त्यात होते. तेही 
प्रत्यक्ष वस्तुस्थिती या स्वरूपाचे नसून गृहीतक या स्वरूपाचे. म्हणजे 
`आम्हाला असे वाटते, म्हणून ते तसेच आहे' अशा पद्धतीचे. तिथवर सुद्धा काही 
हरकत नव्हती. काही नाठाळ लोक असतातच. पण त्यात एक वाक्य होते की, `असे काही
 यापुढे लिहाल आणि प्रसारित कराल तर आम्ही तुमच्यावर तुटून पडणारच.' ही 
चक्क अरेरावी आणि हडेलहप्पी होती. तरीही माझा अनुभव लक्षात घेऊन, माझे निखळ
 प्रबोधनाचे हेतू आठवून आणि थोडेसे दुर्लक्ष करून; त्यावर काही उत्तर 
लिहिण्याऐवजी मी दुसरा मार्ग उपयोगात आणला.
माझ्या समर्थनार्थ जे 
मुद्दे मी मांडले होते त्यांना आधार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 
`thoughts on pakistan', महात्मा गांधींचा हिंदुत्वावरील संपूर्ण लेख, 
सर्वोच्च न्यायालयाचे हिंदुत्वाच्या मुद्यावरील संपूर्ण निकालपत्र, 
मनुस्मृती आणि डॉ. आंबेडकर याविषयीची काही माहिती आणि अजमेर दर्ग्यापुढून 
जाणारे संघाचे संचलन आणि त्याचे स्वागत करणारे मुस्लिम बांधव यांचे 
छायाचित्र `चव्हाटा'वर टाकले. थोड्याच वेळात  `चव्हाटा'च्या अॅडमीनचा मेसेज
 आला की, मी कोणतेही प्रचारकी साहित्य त्या ग्रुपवर टाकू नये. खरे तर मी 
टाकलेल्या छायाचित्राशिवाय अन्य काहीही प्रचारकी या पद्धतीचे नव्हते. मी 
त्यांना कळवले की, मी कोणाचा प्रचार वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. मी माझे 
विचार स्वतंत्रपणे मांडत असतो. परंतु योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे 
आवश्यक आहे. अपप्रचार आणि गैरसमज रोखण्याचा तोच परिणामकारक आणि एकमेव मार्ग
 आहे. छायाचित्र हा प्रचार नसून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. त्यावर 
अॅडमीनचे उत्तर आले की, सध्या व्यस्त आहे. मग बोलू. थोड्या वेळाने 
`चव्हाटा'वर पाहिले तर माझी सगळी पोस्ट काढून टाकलेली होती. मी लगेच 
अॅडमीनला मेसेज पाठवला आणि ग्रुप सोडला.
हा प्रकार इथेच संपला. तो 
फार काही मनावर घ्यावा असेही काही नाही. तो ग्रुप सोडल्याने मी माझे विचार 
लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही असेही नाही. केवळ फेसबुकचा विचार केला 
तरीही अन्य अनेक पर्याय आहेत. बाकी मार्ग तर आहेतच. त्या ग्रुपची 
सदस्यसंख्या साडेआठशेच्या जवळपास आहे. त्याहून जास्त लोकांपर्यंत एका 
दिवसात प्रत्यक्ष पोहोचण्याची माझी शक्ती आहे. त्यामुळे तोही भाग नाही. हे 
सगळं काही लिहून शेअर करावं असंही मनात नव्हतं.
परंतु हा प्रकार 
झाल्यावर दूरचित्रवाणी पाहिली. त्यावर headlines today वर राजीव कंवल चर्चा
 घेत होता. मार्कंडेय काटजू आणि अरुण जेटली वादावर. मोदींना मुस्लिम 
समाजाचा असलेला विरोध, हा मुद्दा होता. राजीव कंवल मुद्दा मांडत होता की, 
मोदी तर मुस्लिम बहुल भागातही जिंकले आहेत. विधानसभाही जिंकले आहेत आणि 
स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकले आहेत. पण काटजू यांचे एकच उत्तर, मोदींना
 मुसलमानांचा प्रचंड विरोध आहे. राजीव कंवल मांडत असलेल्या वास्तवावर 
बोलायला ते तयारच नव्हते, बस आपला निष्कर्ष रेटणे एवढेच.
वास्तविक, 
समोर असलेल्या आणि येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावून
 निष्कर्ष काढणे हीच शास्त्रीय पद्धत असू शकते. दुसरी कुठलीही नाही. पण 
निष्कर्ष आधीच काढायचा, त्याचा आधार `आम्ही म्हणतो म्हणून'; अन्य 
गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. आणि एकदम जाणवले, प्रेस कौन्सिल ऑफ 
इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष काय आणि `चव्हाटा'वरील दीडदमडीचे विद्वान काय, 
एकाच  माळेचे मणी. त्यांचे हेतू वेगळे सांगायची गरज आहे का? समाज एकसंध 
राहावा असे त्यांना खरेच वाटते का?
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ फेब्रुवारी २०१३                 
                            
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा