बुधवार, २० जुलै, २०२२

खेडेकरचा आगाऊपणा

मीडिया वॉच च्या वतीने जो कार्यक्रम गेल्या आठवड्यात नागपुरात झाला त्यावरील दोन लेख आजच्या दैनिक तरुण भारतमध्ये वाचले. एक डॉ. रामभाऊ तुपकरी यांचा आणि दुसरा श्री. विश्राम जामदार यांचा. त्यात एक उल्लेख असा आहे की, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री. मा. गो. वैद्य हे कार्यक्रमातून मधून निघून गेले आणि वक्त्यांपैकी एक असलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी छद्मीपणे त्याचा उल्लेख करून `मखौल' उडवण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक तर आहेच, पण संघेतर व्यक्ती, विचारधारा आणि संस्थांनी गेली अनेक दशके ज्या पद्धतीचा खालच्या पातळीचा विचार व्यवहार केला त्याला हे साजेसेच आहे. श्री. मा. गो. वैद्य आज ९३ वर्षांचे आहेत. शिवाय आपण प्रकृतीच्या कारणाने पूर्ण वेळ थांबू शकणार नाही हेही त्यांनी कार्यक्रमात सांगितले होते. मुख्य म्हणजे त्यांची विद्वत्ता अर्जित करायला खेडेकरच्या एक लाख पिढ्यांचीही बुद्धिमत्ता कमीच पडेल. त्यामुळे जे जे बाबुरावांना ओळखतात किंवा त्यांच्याबद्दल जाणून आहेत त्यांना वाईट वाटले तरी नवल वाटण्याचे कारण नाही. दोन संस्कृतींचा आणि दोन सभ्यतांचा हा फरक आहे. त्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणाऱ्या अन्य विद्वानांची सभ्यता आणि संस्कृतीही यानिमित्ताने पुन्हा एकदा उघडी पडली.

- श्रीपाद कोठे

२१ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा