शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

स्वधर्म

घाना येथे गांधीजींचा पुतळा हटवल्याच्या एकूण प्रकरणावरून असं वाटायला लागलं आहे की, माणसाचं बोलणं, व्यक्त होणंच भविष्यात बंद होईल की काय. व्यक्तिवाद, अस्मितावाद, मानापमान हे आता मर्यादे पलीकडे जात आहेत अन म्हणूनच विकृत होत आहेत. आज लोक एकमेकांशी बोलायला, भेटायला सुद्धा घाबरतात, हे वास्तव आहे. अविश्वास हा सुद्धा याच प्रक्रियेतील एक उपघटक. अन याचं एकमेव कारण म्हणजे युरोपीय पुनर्जागरणाने जन्माला घातलेली आणि दोन जागतिक युद्धांनी पक्की केलेली मूल्यव्यवस्था. अत्यंत एकसुरी, एकांगी, स्वप्नाळू, शब्दाधारीत, आवरणस्पर्शी मूल्यव्यवस्था, विचारपद्धती, विचार हे याचे कारण आहे. उजेड आणि अंधार, गांभीर्य आणि विनोद, उच्च आणि निम्न, वर्गीकरण आणि समन्वय/ एकीकरण, कोमलता आणि कठोरता; अशा सगळ्या परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचंही जीवन व्यवहारात स्थान असतं, हे मानायलाच आज कोणी तयार होत नाही. या प्रक्रियेमुळे समजूतदारपणा, विवेक कमी होऊ लागला आहे. अतिसंवेदनशील आणि असंवेदनशील असे वर्ग तयार व्हायला लागले आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचं प्रमाण आणि प्रकार ठरवण्यासाठी केवळ ती गोष्ट पुरेशी नसते. संबंधित घटकांच्या पलीकडील काही तरी असावे लागते. हे जे काही तरी तत्व आहे त्यालाच भारताने धर्म म्हटले आहे. उद्या गीता जयंती आहे. गीतेने सांगितलेला स्वधर्म हा विचार सगळ्या चिंतनाचा आधार होणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

१८ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा