सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

राम माधव यांचे विधान

भाजप प्रवक्ते राम माधव यांनी अल जझीराच्या कार्यक्रमात अखंड भारताबद्दल व्यक्त केलेल्या मतावरून चर्चा सुरु झाली आहे. खरं तर त्यांनी काही खूप खळबळजनक वगैरे काही म्हटलेलं नाही. उलट हिंदू भावविश्व त्यांनी बिचकत बिचकत व्यक्त केलं. ते एका सत्तारूढ पक्षाचे प्रवक्ते असल्याने ते स्वाभाविकही आहे. पण खरे तर या देशाची भावना `अखंड भारत' जवळ थांबू शकत नाही. आम्हाला तर `अखंड जग' हवं आहे. `वसुधैव कुटुंबकम' किंवा `कृण्वन्तो विश्वमार्यम' ही भावना तर अखंड भारताच्या कितीतरी पुढे जाणारी आहे. त्यामुळे पहिली पायरी म्हणून सगळ्यांनी राम माधव यांच्या वक्तव्याचे स्वागतच करायला हवे.

या निमित्ताने आणखीन एक गोष्ट स्पष्ट झाली. संघ आणि संघ परिवाराला मुसलमानांशी ना वैर आहे ना त्यांच्याविषयी भीती आहे. उलट त्यांच्यासह जगण्याची संघ आणि परिवाराची तयारी आहे. सहजीवनाचा व्यवहार विकसित करण्यास त्यांची हरकत नाही. पण बाकीच्यांचे मुसलमान प्रेम किती बेगडी आहे किंवा वरून प्रेमाचा कितीही देखावा करीत असले तरीही मनातून कशी भीती आहे हेच बाकीच्यांनी दाखवून दिले. अर्थात १९४७ पासूनच्या देश विभाजनापासूनच हे वास्तव स्पष्ट झालेले आहे.

जागतिकीकरणाच्या कथित पाठीराख्यांचा उथळपणाही उघडा पडला. त्यांना जगाचा व्यापार एक हवा, पण सगळ्यांचे सहजीवन मान्य नाही. एकमेकांवर कुरघोडी करायला, एकमेकांचे शोषण करायला त्यांना जगाचा बाजार हवा. मात्र `सर्वेपि सुखिन: सन्तु' साठी विश्वकुटुंब मात्र नको.

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा