शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

भीमांजली

जवळपास कुठेतरी लग्न असावं. संध्याकाळी सातपासून कानफाडू आवाजात गाणी सुरू झाली. चार तास डोकेदुखी सुरू होती. वाचन लेखन शक्य नव्हतं. मग सहज वाहिन्या बदलत बसलो. आपण बहुतेक मोजक्या वाहिन्या पाहत असतो. अनेक तर आपल्याला माहितीही नसतात. अशीच एक वाहिनी दिसली - आवाज India वाहिनी. त्यावर चक्क शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू होता. मी त्या वाहिनीवर पोहोचलो तेव्हा व्हायोलिन सुरू होतं. त्यानंतर राकेश चौरसिया यांची बासरी. बरं वाटलं फार. या वाहिनीनेच ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तोच हा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपला तेव्हा आयोजकांनी आभार मानताना या कार्यक्रमाची माहितीही सांगितली. त्यानुसार - गेल्या पाच वर्षांपासून या भीमांजली कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात येते. सकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या वर्षी पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित विश्वमोहन भट सहभागी झाले होते. शास्त्रीय संगीताच्या त्या कार्यक्रमाला पहाटे सहा वाजता तीन हजार लोक उपस्थित होते. हीच परंपरा चार वर्षे चालली. यावर्षी कोरोनामुळे आयोजन आटोपशीर होते. हे सगळे ऐकून खूप समाधान वाटले. सामान्य माणसाची, संपूर्ण समाजाची अभिरुची घडवण्यात असे कार्यक्रम नक्कीच मोलाचे असतात. अभिरुची घडवण्याची ही प्रक्रिया आणखी विस्तारायला हवी आहे.

- श्रीपाद कोठे

१९ डिसेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा