शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

Ultra liberal भारतीय विचार

भारतीय विचार हा आजच्या ultra liberal विचारांपेक्षाही अधिक super ultra liberal आहे. खाणेपिणे, वस्त्रप्रावरणे, नातीगोती, नीतीनियम, उपासना अशा सगळ्याच गोष्टीत. पण दोहोत एक मुलभूत फरक आहे आणि तोच सगळ्यात महत्वाचा अन मोठा आहे. आजच्या ultra liberal विचारांची दृष्टी ऐहिक, मृण्मय, लौकिक, जड, मूर्त, साकार यांच्याकडे आहे. ते धरून ठेवून, त्यात काडीचाही बदल होऊ नये असा प्रयत्न ultra liberal करतात. तर, भारतीय super ultra liberal विचारांची दृष्टी चिन्मय, चेतन, अमूर्त, निराकार याकडे आहे. ऐहिकाला घट्ट बिलगून liberation चा प्रयत्न अधिकाधिक गुंतागुंत, संघर्ष आणि शेवटी सर्वनाश यांना कारणीभूत ठरतो. त्यामुळेच असा प्रयत्न करणारे बहुतांशी अखेर निराश झालेले आढळतात. उलट ऐहिकाचा त्याग करत करत संपूर्ण liberation साठी प्रयत्न करणारी यशस्वी, सार्थक जीवने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. ऐहिकाला धरून ठेवून संपूर्ण liberation तत्त्वतः, कागदावर सुद्धा शक्य नाही. उलट चिन्मयाचा वाटसरू संपूर्ण liberation चा स्वाभाविक स्वामी होतो. ऐहिक न सोडता संपूर्ण liberation हे- तत्व, तर्क आणि व्यवहार या तिन्ही दृष्टीने अशक्य आहे. भारतीय विचार मात्र जसजसे लौकिक कमी होईल तसतसे liberation वाढवीत जाणारा आहे. जो लौकिकासाठी जगतो त्याला किमान liberation आणि जो लौकिक पूर्ण सोडून देतो त्याला संपूर्ण liberation. जैनांचा दिगंबर पंथ, शेगावचे गजानन महाराज किंवा संजीवन समाधी घेणारी ज्ञानेश्वर माऊली यांची उदाहरणे सांगता येतील. म्हणूनच संन्याशाला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय बंधने राहू नयेत अशी धारणा आहे. ही super ultra liberal मंडळीच `स्वदेशो भुवनत्रयम' ही भावना चरितार्थ करू शकतात. त्यासाठीच त्यांना संपूर्ण liberation. सगळ्यांना एकच फुटपट्टी लावणाऱ्या वर्तमान सामाजिक सिद्धान्तांपेक्षा भारतीय समाजशास्त्र वेगळे आहे. त्याचा विविध अंगाने साक्षेप ही वर्तमानाची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

५ डिसेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा