सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

संसद भवन

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नवीन संसद भवन उभारण्याच्या संदर्भात प्रस्ताव दिला असल्याची बातमी आहे. विद्यमान संसद भवन ८८ वर्षांचे असून जागाही अपुरी पडते असे त्यांनी याबाबत म्हटले आहे. नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनाच्या जागेवर उभारावे किंवा त्यासाठी दुसरी जागा द्यावी, असे त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

नवीन संसद भवन उभारण्याची सूचना नक्कीच स्वागतयोग्य आहे. माझे-तुझे असा वाद न करताही एक गोष्ट मान्य करावीच लागेल की, नवीन संसद भवन `आपले' राहील. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची भावना वेगळी राहील. अन ते आवश्यकही आहे. सध्याचे संसद भवन इंग्रजांचे आहे. आजवर त्याने दिलेल्या योगदानासाठी धन्यवाद देऊन त्याला निरोप द्यावा. नवीन संसद भवन भारतीय इमारत, शिल्प व चित्र शैलीनुसार उभारावे. ते मजबूत व टिकावू असावे, पुढच्या किमान १०० वर्षातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन तेवढे प्रशस्त असावे, अन सूर्यप्रकाश अन हवा यांचे सुयोग्य नियोजन त्यात असावे. त्यात आवाजाचा नीट विचार करावा अन एअर कंडिशनर नसावे. शिवाजी महाराजांच्या दरबारात अगदी शेवटला माणूस बोलला तरीही राजांना अन दरबाराला स्पष्ट ऐकू जाईल अशी व्यवस्था होती, असे वर्णन आहे. नागपूर जवळच्या बाजारगाव येथे एक पुरातन गुहा सापडली असून, त्यात एक रंगमंच आहे. या रंगमंचाची देखील ही खासियत आहे. ध्वनिक्षेपक नसतानाही आवाज दूरवर आणि स्पष्ट. अशा वैशिष्ट्यांचाही विचार नवीन संसद भवन उभारताना व्हावा.

नवीन संसद भवन उभारले गेल्यास आताच्या जागेवरच उभारावे. दुसरी जागा त्यासाठी दिल्यास दोन गोष्टी होतील. एक तर आजकाल जागेचा तुटवडा आहे. त्यात भर पडेल. दुसरे म्हणजे, लगेच विद्यमान संसद भवन वारसा म्हणून जतन करण्यात येईल. यानिमित्ताने या `वारसा' राजकारणाचा अन समाजकारणाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. `वारसा' `स्मृतीस्थळ' इत्यादी प्रकरण आपल्या येथे वाजवीपेक्षा जास्त आहे. एक उदाहरण द्यायचे तर- पन्हाळगडाचे देता येईल. पन्हाळगडावरील गंगा, यमुना, सरस्वती ही धान्याची तीन अगडबंब कोठारे वटवाघुळांची वस्ती झाली आहे. एकीकडे शेतमाल साठवण्याच्या कोठारांची वानवा आहे तर दुसरीकडे, असलेली कोठारे उंदीर घुशींसाठी राखीव करून ठेवलेली आहेत. यासाठी यासंदर्भात मुळातूनच विचार व्हायला हवा. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या बंगल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने एक चांगला पायंडा घातला आहे. तीच भूमिका पुढेही कायम राहावी आणि नवीन संसद भवन आहे त्याच जागेवर उभारावे किंवा अन्य जागेत उभारले तरीही सध्याच्या इमारतीचे स्मारक करू नये किंवा त्या जागी नवीन स्मारक वा त्यासारखे काही करू नये. अन्य जागांसारखीच ती जागा मानावी.

- श्रीपाद कोठे

२८ डिसेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा