शनिवार, ११ जून, २०२२

जातीव्यवस्था

फक्त प्रामाणिक विचार करणाऱ्यांसाठी एक मुद्दा-

स्कील डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया आणि एकूण आर्थिक इतिहास याविषयी विचार करताना सहज एक कल्पना चमकून गेली की, आमच्या येथील जुन्या जातिव्यवस्थेबद्दल प्रचंड घृणा, अनेक विपरीत अर्थ, गैरसमज वगैरे इंग्रजी शासनकर्त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक तर नसतील पसरवले? उत्पादन, वितरण, उपभोग, तंत्रज्ञान, कौशल्य, कच्चा माल, पक्का माल, साठवणुकीच्या सोयी, गुंतवणूक, मनुष्यबळ वगैरे गोष्टींवरच अर्थकारण अवलंबून असते. जगात कुठेही गेले तरी. गेली अनेक वर्षे जगात सगळे देश, सगळे समाज याच गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जाती व्यवस्थेत या गोष्टींचा अन शिवाय सामाजिक स्थिरता, मूल्य, व्यक्तिमत्व विकास यांचा अपूर्व संगम होता. अर्थात सगळ्या व्यवस्थांप्रमाणे त्याचेही गुणदोष होते. त्याची चिकित्सा होतही होती आणि व्हायलाही हवी. पण आज जातीव्यवस्था हा शब्द उच्चारायची सुद्धा सोय राहिलेली नाही. तो शब्द उच्चारताच अंगावर पाल पडल्यासारखी प्रतिक्रिया उमटते. हा जो नकारात्मक, घृणेचा, पापाचा आणि ओशाळलेपणाचा भाव आहे, तो निर्माण करून इंग्रजांनी आपले इप्सित तर साध्य केले नसेल? अन्यथा, उण्यापुऱ्या २०० वर्षांपूर्वी ज्या देशात भिकारी नव्हता (खुद्द ब्रिटीश संसदेत १८३५ साली हे अधिकृतपणे सांगण्यात आले.) त्या देशाची आज ही स्थिती का झाली असावी? यावर सखोल, प्रामाणिक चिंतन व्हायला हवे.

- श्रीपाद कोठे

१२ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा