शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

वेगळे घर आणि कलह

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया येथील प्रकरणांवर चर्चा सुरु असताना एकाने मुद्दा मांडला की, अफजल गुरूच्या संबंधात काश्मीरच्या पीडीपी पक्षाची भूमिकाही वेगळी (म्हणजे त्याची फाशी अयोग्य आहे अशी) आहे. भाजपा त्यांच्यासोबत सत्तेत राहू शकते, अन जेएनयु व प्रेस ट्रस्ट मधील लोकांवर मात्र आक्षेप; हे कसे? प्रश्न खरंच छान आहे. वरवर पाहता बिनतोड सुद्धा. पण हा युक्तिवाद ऐकला आणि खुदकन हसायला आलं. आईनस्टाईनची एक गोष्ट सांगतात. त्याने मांजर आणि तिच्या पिल्लासाठी दोन वेगळी दारे केली होती. मांजरीच्या मोठ्या दारातून लहान पिल्लू जाऊ शकेल हे सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या आईनस्टाईनच्या लक्षातच आलं नाही. बहुधा आजचे सगळे विद्वान आईनस्टाईनच्या मार्गावरच असावेत. अन्यथा वरील बिनतोड युक्तिवाद सुचलाच नसता. कुटुंबातल्या घटकांनी गरजेपोटी, सोयीसाठी वेगळे राहणे आणि कलहातून कुटुंब विभक्त होणे याचा फरक कळणे इतके दुरापास्त का व्हावे? अफजल गुरुबद्दल वेगळे मत वा सहानुभूती असणे आणि ज्या व्यवस्थेने याबाबत निर्णय घेतला त्याबद्दल शत्रुत्व असणे, देशाच्या शत्रूबद्दल प्रेम असणे, मनात केवळ सूड आणि द्वेष असणे; यातील फरक समजत नाही की समजून न समजल्यासारखे करायचे आहे? देशभरात अगदी दिल्ली ते गल्ली असे लोक आहेत. विचारस्वातंत्र्य अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या नावाखाली त्यांना सूड, द्वेष आणि शत्रुता करायची आहे. एका घराची दोन, तीन, चार घरे होणे क्लेशदायक नसते. क्लेशदायक असतो कलह. कलह कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. डार्विनचा सिद्धांत, समाजवाद, पाश्चात्य लोकशाही, इंग्रजांची सत्ताभिलाशी धूर्तता; यांनी या देशात संघर्ष आणि संघर्षाच्या chain reaction ची बीजे पेरली. येथील असलेल्या व नसलेल्या देखील त्रुटींचा, कमजोरींचा, येथील वेगळ्या जीवनशैलीचा आणि जीवनदृष्टीचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. काळाचा महिमा आणि सत्ता व संपत्तीची जादू यांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. समस्यांचा वा प्रश्नांचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीने करावयाचा असतो आणि त्यावरील उपायांचा विचार संश्लेषणात्मक पद्धतीने करायचा असतो. सगळे पाश्चात्य विचार, सिद्धांत वा शास्त्रे मात्र; समस्या आणि त्याचे उपाय दोन्हीचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीनेच करतात. उदा.- बोटाला काही झाले तर त्याची चिकित्सा बोट म्हणूनच करावी लागेल. पण त्याला पट्टी बांधताना किंवा प्लास्टर घालताना किंवा औषधयोजना करताना हाताचा वा संपूर्ण शरीराचा विचार अपरिहार्य ठरतो. पट्टी बांधताना वा प्लास्टर घालताना बाकीच्या हाताची सोय, गैरसोय पाहावी लागतेच. किंवा द्यावयाच्या औषधाचा अन्य काही परिणाम होत नाही ना हेही पहावे लागते. कारण त्रास बोटाला असला तरीही बोट हे हाताचे वा शरीराचे अंग आहे हे नजरेआड करून चालत नाही. यालाच म्हणतात एकात्म दृष्टी. holistic approach तो हाच. मात्र गेली अनेक वर्ष शिक्षण, प्रबोधन, बौद्धिक चळवळी आदी माध्यमातून आमची दृष्टी इतकी विकृत करून टाकली आहे की हे समजण्याची शक्तीही आम्ही गमावतो आहोत की काय असे वाटते. महात्मा गांधी ज्यावेळी म्हणत की, don't throw baby with bathwater, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. चुकीच्या रस्त्याने आम्ही खूप दूर आलो आहोत. मागे फिरून पुन्हा योग्य मार्ग धरावा लागेल. त्याला इलाज नाही. काश्मीर काय, फुटीरतावाद काय, इसीस काय किंवा विचार वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय... योग्य रस्ता धरण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा