शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

Perception

अनेक गोष्टी perception च्या असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि त्याचं सतत सुरु असलेलं काम, हे दिल्लीत कोण कुठे असावं किंवा सत्ता कोणाची असावी, यासाठी नाही. संघ त्यासाठी काम करत नाही. पण हे मान्य नसल्याने, यावर विश्वास नसल्याने किंवा हे समजत नसल्याने अनेक चर्चा, समज- गैरसमज, वाद- प्रतिवाद, खंडन- मंडन, आरोप- प्रत्यारोप सुरु असतात आणि त्यांचा गलबला माजलेला दिसतो. त्यातच या विषयाची चर्चा करताना- `संघ राजकारण करत नाही का? संघाचे भाजपवर नियंत्रण नाही का? संघाची राजकारणात लुडबुड कशाला?' वगैरे सारखे प्रश्न उपस्थित होतात आणि चर्चाच भरकटत जाते. मात्र, `संघाचं काम दिल्लीत कोण असावं किंवा नसावं' यासाठी नाही हे स्पष्ट झालं तर अनेक भ्रम दूर होतील. आज निर्माण होणारे वा केले जाणारे अनेक प्रश्न मग त्यामुळे कायमचे निकाली निघतील. म्हणजे कसे- तर संघ राजकारण करतो का, पक्ष चालवतो का- या प्रश्नांचे सरळ उत्तर आहे की, तो तसे करीत असेल किंवा नसेल; तरीही तो दिल्ली कोणाची असावी यासाठी काम करीत नाही. संघ त्याला जेव्हा जे योग्य वाटेल ते (सभ्य भारतीय समाजाच्या चौकटीत राहून) करेल, पण त्याचा उद्देश दिल्ली कोणाची असावी हा नाही. आणखीन स्पष्ट करायचं तर- १) दिल्लीत एखादी सत्ता आली म्हणून त्याचं काम संपत नाही, २) दिल्लीतून एखादी सत्ता गेली म्हणून त्याचं काम थांबत नाही, ३) दिल्लीत एखाद्याची सत्ता आली वा आली नाही तरीही काम सुरूच राहतं, ४) त्याच्या सत्ता विषयक कामाचा केंद्रबिंदूही सत्ता नसतो (बाकीच्या कामांचा तर नसतोच), ५) सत्ता धरून ठेवावी म्हणून संघ आपले विचार, काम आणि कार्यपद्धती बदलत नाही. समर्थक, विरोधक, हितचिंतक, निरीक्षक सगळ्यांनीच हा सूक्ष्म मुद्दा लक्षात ठेवायला हवा.

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा