रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

बिटकोईन

बिटकोईन ही अर्थप्रभावाची गुन्हेगारी आहे. आपापल्या चलनातील लाखो वा हजारो रुपये गुंतवून लोक बिटकोईन का घेतात? हे व्यवहार कोण करतात? उत्तर फार सोपं आहे अमाप पैसा ज्यांच्याकडे आहे ते तो पैसा आणखीन वाढवण्यासाठी ही गुंतवणूक आणि व्यवहार करतात. यात नुकसान झालं तरी ज्यांचं जगणं बाधित होत नाही असेच लोक यात असतात. त्यांचा पैसा वाया गेला किंवा वाढला तरीही त्या दोन्हीचा त्यांच्या जगण्याशी संबंध असत नाही. त्यांना फक्त त्या व्यवहारांची नशा हवी असते. एक नशा करणारा जसा आपला परिवार बरबाद करतो तसेच ही बिटकोईन नशा करणारे जगाचा परिवार बरबाद करतात. मग अशांना थांबवत का नाहीत? उलट वेगवेगळे लोक या बिटकोईनचे (आभासी चलनाचे) आपापले व्हर्शन का आणत राहतात? आता तर भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा आपले स्वतःचे आभासी चलन आणण्याचा विचार करते आहे अशी चर्चा आहे. का? कारण आहे वर्तमानात मानवजातीने स्वीकारलेली जीवनमूल्ये. हा फार गहन वगैरे विषय नाही. कारण या बिटकोईन व्यवहारांना अवैध ठरवण्यासाठी जेव्हा केंद्र सरकारने प्रयत्न केले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावले आणि व्यक्तिस्वातंत्र्य उचलून धरले. अनेक बाबतीतल्या व्यक्तीस्वातंत्र्याप्रमाणेच या बाबतीतही व्यक्तिस्वातंत्र्य घातक ठरते आहे, ठरणार आहे. हे आभासी चलन अवैध ठरवता येत नाही म्हणून अनेक जण आपापले आभासी चलन आणत आहेत. अशी आभासी चलने येऊ नयेत असे वाटत असेल तर असलेल्या आभासी चलनांना अवैध ठरवावे लागेल. त्यासाठी आपली मूल्यव्यवस्था बदलावी लागेल. ही मूल्यव्यवस्था बदलायची तर आपल्या जीवनविषयक मूलभूत धारणा बदलाव्या लागतील. त्यासाठी योग्य तत्वज्ञानाची मांडणी करून ते मानवांच्या मनात रुजवावे लागेल. राजकारणापासून विज्ञानापर्यंत, सुखाच्या कल्पनांपासून मनोरंजनापर्यंत, व्यक्तिगत आकांक्षांपासून व्यवस्थांपर्यंत; सर्वत्र हे करावे लागेल. त्याला पर्याय नाही आणि जवळचा मार्गही नाही. आभासी चलनाचे महासंकट या मूलभूत मानवी जाणिवांच्या परिवर्तनाची मागणी करणारे संकट आहे. अशी संकटे मानवजातीवर येतच राहिली आहेत. त्यातून मानव बाहेर पडलाच आहे. आताही तसेच होईल. हा युक्तिवाद होऊ शकतो. तो समाधान देणाराही आहे आणि बरोबरही आहे. परंतु अपूर्ण आहे. कारण अशी संकटे येणे आणि त्यातून बाहेर पडणे या प्रक्रियेत जे काही नुकसान, त्रास, तडाखे मानवाने भोगले आहेत त्याकडे हा युक्तिवाद दुर्लक्ष करतो. शिवाय तो माणसाचे माणूसपण हिरावून घेतो. त्यामुळेच फार शौर्यपूर्ण वाटणारा हा युक्तिवाद टाकून द्यावा लागतो. वाईट वाटले तरी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायला हवी की, हे मूलभूत जाणीव परिवर्तन करू शकण्याची क्षमता असणारा हिंदू समाज याबद्दल कमालीचा अनभिज्ञ आणि अज्ञानी आहे. दुर्दैवाने सध्याच्या अयोग्य प्रवाहाला बळच देतो आहे. विचित्र आणि उथळ गोष्टींमध्ये बुडाला आहे. शेवटी सर्वकाही predestined असतं हे तर आहेच.

- श्रीपाद कोठे

रविवार, २८ फेब्रुवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा