गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

कुटुंब व्यवस्था

काल डॉ. मोहनजी भागवत यांनी कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात काही वक्तव्य केले. त्यावर कोण गदारोळ माजला. आज दोन वेगवेगळ्या वृत्तपत्रात दोन मजकूर वाचले. यातील एकही वृत्तपत्र तरुण भारत, पांचजन्य, organiser, विवेक इत्यादी नाही.

एक मजकूर आहे, विनापत्य राहण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये मूळ धरतो आहे. त्याची कारणमीमांसाही आहे. दुसरा मजकूर आहे, मुली महिला पळून का जाताहेत. दोन पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील काही आकडेवारीही त्यात आहे. पळून जाण्याचे हे प्रमाण छोट्या कालावधीत दोन डझनाच्या पुढे आहे. याचीही थोडी कारणमीमांसा आहे. तिसरा मजकूर आजच्या वृत्तपत्रात नाही. पण आज घराघरात चर्चा असते तो म्हणजे; विवाहजुळणी. त्याचीही कारणमीमांसा होत असते आणि ती सगळ्यांच्या परिचयाची आहे.

तिन्ही बाबतीत पैसा आणि शिक्षण यांनी माणसाच्या मनात निर्माण केलेली उन्मत्तता हेच कारण आहे. याचीच परिणती घटस्फोट किंवा कुटुंबांच्या विघटनात होते. ही साधा तर्क, साधे अनुभव, साधी समजूतदारी आहे. आजच्या दोन्ही वृत्तपत्रात आणि घरोघरी होणाऱ्या मतप्रदर्शनात हेच मुद्दे पुढे येतात.

जीवनाच्या अन्य अंगांप्रमाणेच शिक्षण आणि संपन्नता यांनी त्यांचे मूळ हेतू गमावले आहेत. Career, achievement, goals, targets यांना जे अति आणि अवास्तव महत्व आले आहे; आणि भरीस भर व्यक्तिवादाची त्याला जी जोड मिळाली आहे; त्याने व्यक्तिजीवन, समाजजीवन ज्या पद्धतीने अस्थिर, अशांत, पोकळ आणि निरर्थक करून टाकले आहे; तो सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे. नाटके, चित्रपट, कथा, कविता, निबंध, मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय विचार विनिमय; या सगळ्यात हे झळकत असतेच.

त्यावरचे उपाय म्हणून ज्यावेळी समुपदेशक किंवा आध्यात्मिक चिंतक पैसा, शिक्षण आणि अन्य ऐहिक बाबींना मर्यादित करण्यास सांगतात तेव्हा ते योग्यही ठरते. तेच डॉ. मोहनजी भागवत सांगतात तेव्हा मात्र तो टळावकी आणि उपहासाचा विषय होतो !

आज जगापुढे अर्थाच्या प्रभावाचे संकट आ वासून उभे आहे. (यावरील विस्तारपूर्वक विवेचन 'अर्थप्रभावाची गुन्हेगारी' या ब्लॉगवर उपलब्ध माझ्या लेखात वाचता येईल.) दुसरे तेवढेच महत्वाचे संकट म्हणजे; माहिती आणि अध्ययन यांचे ज्ञानात रूपांतर करण्याचे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळते. (अर्थाचे आकलन थोडे असते हा भाग वेगळा.) पण अध्ययन म्हणजेही ज्ञान नाही. खूप अध्ययन असणारा पंडित असू शकतो ज्ञानी नाही. आज ज्ञाननिर्मितीची मोठी समस्या आहे.

एक महत्वाची बाब शेवटी नमूद करणे आवश्यक आहे. सरसंघचालक काही बोलतात, भाष्य करतात तेव्हा; ते सगळ्या मानव समूहासाठी असते आणि त्यात संघ स्वयंसेवकांचाही समावेश असतो. स्वयंसेवक म्हणजे काही विशेष अथवा वेगळी कॅटेगरी नसते. एवढेच की एका रचनेचा भाग आहोत हे त्यांनी स्वीकारले असल्याने ते त्याकडे किंचित सौम्यपणे पाहतात. मात्र पुष्कळदा स्वयंसेवकांचीही वेगळी मते असतात. सरसंघचालक ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते स्वयंसेवक आणि अन्य अशा सगळ्यांच्या विचार प्रक्रियेला आवाहन असते.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा