रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

मातृभाषा

आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. जगात सगळ्यांनाच मातृभाषा जपण्याची गरज वाटू लागली आहे असाच त्याचा अर्थ होईल. ही गरज वाटणे आणि त्यासाठी ठोस वा प्रतिकात्मक काही करणे चांगलेच. यानिमित्ताने भाषा आणि बोली अशीही चर्चा होणे स्वाभाविकच. मुळात असा भेद करणे फारसे बरोबर वाटत नाही. माणसाने ठरवलेल्या भाषेच्या मापदंडावर बोली बसत नसतील तरीही बोली हीच भाषेची प्रथमावस्था आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. इतका सोपा असलेला विषय इतका सोपा मात्र राहत नाही. कारण त्यात संख्या, पैसा, अनुदाने, जमिनी, अस्मिता, वर्चस्व, श्रेष्ठत्व अशा गोष्टी जोडल्या जातात. त्यावर तूर्त फारसे बोलणार नाही. पण एका विषयाकडे लक्ष मात्र वेधावेसे वाटते. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार १९ हजार ५६९ भाषा/ बोली आहेत. त्यातील फक्त १२१ भाषा अशा आहेत की ज्या बोलणाऱ्या लोकांची संख्या १० हजारा पेक्षा जास्त आहे. म्हणजेच १९ हजार ४४८ भाषा/ बोली अशा आहेत ज्या बोलणाऱ्यांची संख्या १० हजाराहून कमी आहे. हे सगळे अभ्यास म्हणून ठीक आहे. इतिहास म्हणून त्याची नोंद असावी हेही योग्यच. पण या सगळ्या भाषा/ बोली टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा असा जर आग्रह धरला जाईल वा जात असेल तर ते मात्र पटणारे नाही. जीवनाचा प्रवाह वाहत असतो. तो स्वाभाविकपणे वाहत राहावा आणि त्या स्वाभाविक धारेत जे काही राहील वा जाईल ते स्वीकारायला हवे. मुद्दाम राखण्याचा प्रयत्न आणि मुद्दाम संपवण्याचा प्रयत्न; दोन्ही चुकीचेच म्हटले पाहिजेत. आज जगभरात मातृभाषेविषयी निर्माण झालेली आस्था, त्या त्या भाषा संपवण्याच्या अनैसर्गिक प्रयत्नांची प्रतिक्रिया आहे. ती योग्यच आहे पण त्याचवेळी अट्टाहास सुद्धा बरोबर नाही. दोन्हीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

रविवार, २१ फेब्रुवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा