रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

व्यवस्था, अव्यवस्था

व्यवस्था राखताना त्यातून अव्यवस्था किंवा गोंधळ निर्माण होणार नाही हेही पाहिले पाहिजे. सध्याच्या दोन निर्णयांमुळे हा विचार मनात आला. पहिला म्हणजे मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध fir दाखल करण्याचा निर्णय. अन दुसरा निर्णय माघ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना धर्मशाळा वा अन्यत्र निवास देऊ नये यासाठी आदेश. मास्क बांधणे आणि यात्रेसाठी गर्दी न करणे या गोष्टी योग्य आहेतच. पण त्यासाठी जे उपाय केले जातील त्याने नागरिकांचे काय व्हायचे ते होवो पण व्यवस्थांमध्ये गोंधळ वाढेल, व्यवस्था व प्रशासनावर ताण वाढेल याबाबत दुमत होऊ नये. अन ताण आणि गोंधळ वाढल्यावर व्यवस्था आणि प्रशासन किती कार्यक्षम राहील? किती परिणामकारक राहील? मग नेहमीचे कागदोपत्री सगळे ठीकठाक दाखवणे बाकीचे राम भरोसे. काय साध्य होते याने? मग न ऐकणाऱ्या लोकांचे काय करायचे? त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे. त्यांचा उपसर्ग बाकीच्यांना होऊ शकतो त्याचे काय? त्याची काळजी बाकीच्यांनी घ्यावी. वास्तविक एका मर्यादेनंतर व्यक्ती काय किंवा व्यवस्था काय, जबाबदारी घेऊ शकत नाहीत. अन एका मर्यादेनंतर जबाबदारी न घेणेच योग्यही ठरते. त्यातूनच लोकांमध्ये स्वतःच्या जबाबदारीची भावना वाढू शकते. सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो पण त्या गोंधळापोटी होणाऱ्या क्रियाप्रतिक्रियातूनच व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारीची भावना वाढेल. प्रत्येक वेळी प्रशासनाने अन शासनाने सूत्र हाती घेणे आणि शिस्त लावणे वगैरेला काहीही अर्थ नाही. त्याने अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीतच पण समाजाचा मनोविकास देखील होणार नाही. आजवर हेच चालत आले आहे. यापुढे हळूहळू बदल व्हावा एवढेच.

- श्रीपाद कोठे

२१ फेब्रुवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा