मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

पुलवामानंतर

पुलवामा घटनेनंतर एक स्वाभाविक आक्रोश सर्वत्र आहे. लोकदेखील फार काही ऐकून घेण्याच्या, विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतु हीच वेळ आहे की, काही गोष्टींचा मुळातून, शांतपणे विचार करायला हवा. याच क्षणी काही गोष्टी अधिक नेमक्या समजून घेता येऊ शकतात. अर्थात हे व्यक्तिगत पातळीवरच शक्य आहे. जाहीरपणे या गोष्टी मांडणे फारसे कठीण नसले तरीही, एक तर त्याचा उपयोग नाही आणि दुसरे म्हणजे त्याला फाटे फुटून फक्त गोंधळ तेवढा माजेल. विचार करणाऱ्या लोकांनी मात्र व्यक्तिश: काही गोष्टींचा शांतपणे विचार करायला हवा असे वाटते.

१) पुलवामा सारखी घटना पहिल्यांदाच घडली आहे का?

२) दुष्ट शक्तींचा पूर्ण नायनाट शक्य आहे का? (दुष्टता आणि सुष्टता यांची मुळं.)

३) चंद्रगुप्त, शिवाजी, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, बंदा बैरागी, पेशवे, क्रांतिकारक, नेताजी, इंदिरा गांधी (बांगला देश), अटलजी (कारगिल); किंवा जगात सर्वत्र शीत किंवा प्रत्यक्ष युद्धे; दोन जागतिक महायुद्धे, रामायण वा महाभारत युद्धे; यातील कोणत्याही युद्धाने दुष्टता नाहीशी झाली का?

४) सिकंदराच्या स्वारीपूर्वीचा मोठा काळ, इस्लाम स्थापनेपूर्वीचा मोठा काळ; भारतीय समाज शांततापूर्ण व सुखी जीवन कसा आणि कशाच्या भरवशावर जगला?

५) सिंधू नदीच्या खोऱ्यातील वैदिक संस्कृती (विचार, मानस आणि धारणा या अर्थाने) हळूहळू कशी पसरली आणि स्थिरपद झाली?

६) मानवी संस्कृती किंवा सुसंस्कृत मानव घडवण्यात hard power आणि soft power चा वाटा किती?

७) किती काळापासून soft power कडे दुर्लक्ष होते आहे?

८) आपल्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीचा सामना करण्याचा आपद्धर्म निभावताना, सुसंस्कृत मानव घडवणाऱ्या soft power ला जीवनात मध्यवर्ती स्थान देण्यासाठी काय करावे लागेल?

९) soft power म्हणजे केवळ भूतकालीन श्रेष्ठतेचे गुणगान का?

१०) श्रेष्ठतेचे सिद्धत्व आणि श्रेष्ठतेला मान्यता म्हणजे soft power ला जीवनात मध्यवर्ती स्थान मिळणे का?

११) विद्यमान socio-politico-economic व्यवस्था, रचना, धारणा, तत्वज्ञान अंतिम म्हणून स्वीकारून नवीन world order चा, त्यासाठीच्या soft power चा विकास शक्य आहे का?

१२) नवीन world order चा, त्यासाठीच्या soft power चा विकास न करता मानवी प्रश्न सोडवणे शक्य आहे का? सुख शांतीपूर्ण मानवी सहअस्तित्व शक्य आहे का?

१३) इस्लाम, ख्रिश्चन, मार्क्सवाद, इहवाद, जडवाद, समाजवाद, विज्ञानवाद यांना राजकीय वा सामाजिक दृष्ट्या पराभूत करणे हा उद्देश असावा का? अपूर्ण विचारांना पूर्णता कशी येईल याचा उहापोह हवा की त्यांना पराभूत करण्याचा? असा पराभव होऊ शकतो का?

१४) या अन्यान्य विचारांच्या पूर्णतेचा मार्ग आणि पद्धती काय असू शकेल?

१५) ज्या पद्धतीने वैदिक आर्यांनी भारताच्या मोठ्या भूभागावर सुसंस्कृत मानवी जीवन साकारलं तोच प्रवाह संपूर्ण जगासाठी का विचारात घेऊ नये?

१६) या दृष्टीने जाणीव किती आहे? तयारी आणि प्रयत्न किती आहेत?

हे पूर्णपणे बाजूला सारता येईल किंवा त्यास जोडही देता येईल. वैचारिकांच्या अवलोकनार्थ.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा