बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

नियंत्रण आणि परिवर्तन

व्यक्ती आणि समूह (कुटुंब, शेजार, मित्र, सहकारी, परिवार, वेटाळ, वस्ती, गाव, समाज, देश, राष्ट्र, जग, विश्व) यांचा सखोल, व्यापक, सूक्ष्म, गंभीर, साधकबाधक, सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. अनेक गोष्टी सवयीने, गृहीतके म्हणून, खोलात जाण्याची गरज न वाटणे किंवा त्यासाठी इच्छा व अवकाश नसणे; यामुळे चालत राहतात. हे तितकेसे योग्य नाही. माणूस जन्माला येण्याच्या क्षणापासूनच वर्तुळ आणि चौकटी आकाराला येतात, दोन माणसे भेटतात तिथेच (मूल जन्माला येऊन आईला भेटते तिथपासून) समाज जन्माला येतो. वर्तुळ आणि चौकटी आकाराला येतात हे जेवढे स्वाभाविक आणि अपरिहार्य, तेवढेच वर्तुळ आणि चौकटी सोडून किंवा तोडून बाहेर पडण्याची धडपड हेदेखील स्वाभाविक व अपरिहार्य. भारतीय चिंतनाने ही बाब तत्त्व म्हणून स्वीकारली आहे. संन्यास ही गोष्ट, आश्रम व्यवस्थेचा विचार ही त्याची उदाहरणे. व्यवहारात, रोजच्या जगण्यात, त्या त्या वेळचे कायदे, मान्यता यात हे तत्त्व कसे आणि किती होते हा वेगळ्या अभ्यासाचा विषय. मुक्ती हे जीवनाचं सार मानणे हा भागही लक्षणीय. भारतेतर विचारात मात्र ही पूर्णता दिसत नाही. त्यांच्या धार्मिक विचारात देखील ईश्वरीय संबंधांची चौकट अथवा वर्तुळ हीच कायमची, अंतिम अवस्था आहे. चौकटी आणि वर्तुळ तयार होणे, अन त्यातून बाहेर पडणे या जीवनसत्याच्या संदर्भात असलेल्या धार्मिक दृष्टीने सगळ्या जगण्याला आकार दिला की, जगण्याच्या दृष्टीने धार्मिकतेला आकार दिला; हा विद्वानांचा विषय. परंतु मानवी ऐहिक जगण्यावर, चौकटी अंतिम मानण्याच्या दृष्टीचा प्रभाव फार मोठा आहे. जगातील असंख्य ताणतणाव, अगदी देशादेशांचे संबंध किंवा व्यक्तिगत जीवन देखील याने प्रभावित आहे. भारतीय मुक्ती विचाराचा व्यापक, सर्वकष आढावा घेणे आणि जीवनात तो विचार प्रतिष्ठित करणे याची मोठी गरज भासते.

इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांच्या कट्टरपणाचे आणि हिंदूंच्या समावेशकतेचे कारण सुद्धा यातच दडले आहे. या मूळ विषयाला हात घालत नाही तोवर फार फरक पडणार नाही. इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांना नियंत्रित करण्याचे असंख्य प्रयत्न झाले आणि होत आहेत. अन ते वारंवार अपयशी ठरत आहेत. पराक्रम ही काही नवीन गोष्ट नाही. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणणे असो की पाकिस्तानचे दोन तुकडे करणे असो. पराक्रम पूर्वीही गाजवलेला आहेच. पदरात काय पडले? कबीर किंवा नानक देवांचे किंवा त्यासारख्या संतांचे प्रयत्न सुद्धा फारच मर्यादित यश मिळवू शकले. कारण राजकारण असो वा संत, दोन्ही प्रयत्न  इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांना आपापल्या पद्धतीने नियंत्रित करण्याचे होते, त्यांच्यात मूलभूत, आंतरिक परिवर्तन आणण्याचे नव्हते. मूलभूत, आंतरिक परिवर्तन आणायचे तर विचार, तत्त्वज्ञान यांचा आधार घ्यावा लागतो. ती परिवर्तनाची हमी नसते, पण तो आत पोहोचणारा, आत प्रभावित करणारा आशादायक मार्ग असतो. दुर्दैवाने जो हिंदू समाज हे करू शकतो, तोच त्यापासून दूर जात आहे. तोच आज इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांचा शिकार बनतो आहे. अन याच्या उत्तरात खराखुरा, पक्का हिंदू होण्याऐवजी त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तरे देण्याचा निष्फळ अन निरर्थक प्रयत्न करतो आहे. इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांचा वैचारिक, तात्त्विक पराभव वैचारिक, तात्विक पद्धतीनेच करावा लागेल; राजकीय, सामाजिक, लष्करी पद्धती त्यासाठी फारशा उपयोगाच्या नाहीत.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा