गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

एकांगी

कोणी म्हणतो म्हणून माणूस जडवादी असतो का? कोणी म्हणतो म्हणून माणूस चेतनवादी असतो का? कणभर सुद्धा जडवादी नसलेली आध्यात्मिक व्यक्ती जगात असेल का? झाली असेल का? कणभरसुद्धा जडवाद बाजूस न सारणारी जडवादी व्यक्ती जगात झाली असेल का? असेल का? जड-चेतन, विचार-भावना, अंधार-उजेड, स्वतंत्र-परतंत्र, व्यक्ती-समाज, विज्ञान-अध्यात्म, स्त्री-पुरुष; अशा असंख्य रंगी ढंगी अन प्रकृतीच्या घटकांचे स्थान आहेच आहे. या परस्पर टोकाच्या मधील असंख्य रंग ढंग अन प्रकृतीच्या अगणित घटकांचे सुद्धा स्थान आहे. मुख्य म्हणजे ते सगळे समजून घेतले तरीही तळ गाठता येणे शक्य नाही. अन ही देखील मानवी प्रवृत्तीच आहे की- तो कोणती तरी एकच गोष्ट उचलतो आणि एकांगी होतो अन होतच जातो. ही एकांगीपणाची प्रक्रिया थांबवून सर्वांगी (खरं तर अनेकांगी. कारण सर्वांगी हाही शब्द आमची दांभिकता दाखवणारच. अन ही दांभिकता अधोरेखित व्हावी म्हणूनच सरळ सरळ अनेकांगी शब्द न वापरता सर्वांगी शब्द वापरून त्याचे स्पष्टीकरण.) दृष्टीचा विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे- सभ्यतेचा प्रवास, संस्कृतीचा प्रवास, माणूस घडण्याचा प्रवास, माणसाचा देवमाणूस होण्याचा प्रवास, माणसाचा सुपर-माणूस होण्याचा प्रवास. हे प्रयत्न म्हणजेच मानवी उत्क्रांती. बाकी माणसाला शेपूट होते की नव्हते या गोष्टी गौणच.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा