मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

ही हिंमत दाखवतील का?

गोविंदराव पानसरे यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सुरु असलेले राजकारण त्याहून दुर्दैवी आहे. मुळातच हिंसेला अधिकृत समर्थन देणाऱ्या कम्युनिस्ट वा मार्क्सवादी यांनी हिंसा-अहिंसा या गदारोळात पडू नये. याचा अर्थ मी हिंसेचे वा पानसरे यांच्या हत्येचे दुरान्वयानेही समर्थन करीत नाही. पण ज्यांना हिंसा त्याज्य वाटत नाही त्यांनी त्यावरून रण माजविणे समजून घेण्याच्या पलीकडील आहे. गंमत म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर, गांधी ही नावे सतत जपणारी मंडळी जेव्हा साम्यवादी म्हणवणाऱ्यांचे निर्लज्ज समर्थन करू लागते तेव्हा त्यांच्या बुद्धीवादाची अन तर्कबुद्धीची कीव केल्याविना राहवत नाही. शाहू, फुले, आंबेडकर, गांधी यांनी सातत्याने साम्यवाद खोडून तर काढलाच, पण ते लोक त्यापासून चार हात दूर राहिले आणि आपापली कामेही त्यांनी त्यापासून दूरच ठेवली. त्यामुळे आजचे त्यांचे भक्त जेव्हा साम्यवाद्यांच्या गळ्यात गळे घालून गळे काढू लागतात, तेव्हा त्यामागील हेतू लपून राहत नाही. हिंदुत्वाचा शत्रू तो आपला मित्र, एवढे एकच त्यांचे ब्रीद असते. यापोटीच तर्कानेही लाजून मान खाली घालावी अशी तर्कटे मी मी म्हणणारे विद्वान करू लागतात. बाकी, कुणाच्याही हत्येची घटना समर्थनीय ठरूच शकत नाही आणि कोणाचे हात कोणाच्या रक्ताने किती बरबटलेले आहेत हेही कोणापासून लपून राहिलेले नाही. नाही म्हणता, यानिमित्ताने साम्यवादी विचारातील हिंसेच्या समर्थनाला आम्ही कायमची मूठमाती देत आहोत असे त्या विचाराच्या कर्त्याधर्त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावे हे बरे. उगाच आगपाखड करण्याऐवजी, ती हिंमत ते दाखवतील का?

- श्रीपाद कोठे

२३ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा