गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

गांधीजींचे तिसरे तत्त्व

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प साबरमतीला जाऊन सूत कातून आले. याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा साबरमती आश्रमात सूत कातून आले आहेत. एक प्रकारे गांधीजींच्या दोन गोष्टी जगाला सांगून झाल्या आहेत. एक म्हणजे चरखा आणि दुसरी तर आधीच सांगितली गेली आहे, ती म्हणजे अहिंसा. यापुढे गांधीजींचे आणखीन एक तत्व सांगण्याची वेळ आहे. कोणते? 'हे जग आपल्या कोणाचेही नाही. ईश्वराचे (अनिर्वचनीय - तत्वाचे, चेतनेचे किंवा पदार्थाचे) आहे.' अद्वैताचा हा सर्वोच्च सिद्धांत हाच वास्तविक गांधीजींच्या सगळ्या विचारांचा आधार आहे. हा आधार गांधीजींनी शोधलेला नाही. तो दीर्घ कालावधीत विकसित झालेला आहे. गांधीजींनी फक्त त्याचे पुन्हा प्रतिपादन केले एवढेच. हाच एकमेव असा सिद्धांत आहे जो सगळ्यांना समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची शक्ती बाळगतो. घोर जडवादी सुद्धा अंतिम टप्प्यावर अद्वैतीच होऊ शकतो. अद्वैताशिवाय जडवाद सुद्धा अंतिम टोक गाठू शकणार नाही. सगळ्याच्या सगळ्या विचारांची अंतिम परिणती अद्वैत हीच असू शकते. गांधीजींनी तेच मांडले आहे. मात्र हे स्वीकारणे, मान्य होणे कठीण आहे. 'हे विश्व आपल्या कोणाचंही नाही' हे तत्व मुस्लिम, ख्रिश्चन, भांडवलशाही, साम्यवादी, समाजवादी, लोकशाहीवादी, विज्ञानवादी, इहवादी, बुद्धिवादी; कोणालाही मान्य होणे, समजणे कठीणच. कारण त्यांना उघडउघड हे विश्व त्यांच्या मुठीत हवं आहे/ असतं. पण गंमत म्हणजे हे तत्व हिंदुत्व असून हिंदूंना मान्य होणे कठीण आणि गांधीजींनी प्रतिपादन करूनही 'गांधीजप' करणाऱ्यांना मान्य होणे त्याहून कठीण. कारण हे तत्व मान्य करणे म्हणजे हिंदू, भारत, भारतीयत्व, आध्यात्म, या देशाची परंपरा, या देशाची जीवनशैली, या देशाची विचारपरंपरा स्वीकारणे. गांधी नावाचा जप करणाऱ्या आजच्या लोकांची पंचाईत ही आहे की त्यांना गांधी हे नाव फक्त तोंडीलावणे म्हणून हवे आहे. गांधी नाव घेऊन आपला अजेंडा दामटणे हा उद्देश असल्यावर 'हे जग कोणाचंच नाही' हे तत्व कसं स्वीकारता येईल. उरले हिंदू. त्यांची आज पंचाईत ही आहे की, त्यांच्यासाठी हिंदुत्व हे मुस्लिमांचा बंदोबस्त एवढ्यापुरतेच उरले आहे. जगात एकही मुसलमान उरला नाही म्हणजे हिंदुत्व सुफळ झाले असे होत नाही हे समजून घेण्याची त्याची आज तयारी नाही. मुळात मुस्लिम प्रश्नाची खरी सोडवणूक सुद्धा 'हे जग आपल्या कोणाचंही नाही' हीच असू शकते. हे तत्व रुजून बहरत नाही तोवर एकच समस्या कधी मुसलमान म्हणून, कधी ख्रिश्चन म्हणून, कधी साम्यवाद म्हणून किंवा खूप वेगवेगळ्या नावांनी पुन्हा पुन्हा समोर येतच राहील. एकाच समस्येचं हे वेगवेगळ्या नावांनी पुन्हा पुन्हा जगाला, भारताला, मानवाला ग्रासून टाकणं कमी करायचं असेल तर; 'हे जग आपल्या कुणाचंही नाही' हे तत्व सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. नाही तर सूतकताई फोटोजेनिक तेवढी बनून राहील.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा