बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा न पटणारा निर्णय

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा एक निर्णय आज वाचण्यात आला. घटस्फोटीत महिलांना पुनर्विवाहानंतर सुद्धा पोटगी मिळत राहील अशी तरतूद करण्याच्या संबंधातला. याला विचित्र म्हणावे, विक्षिप्त म्हणावे की आणखीन काही. पोटगी कशासाठी असते? निराधार महिला अन निराधार मुलांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी. एखाद्या महिलेने पुनर्विवाह केल्यानंतर ती निराधार राहते का? तिचा नवीन पती तिची अन असल्यास मुलांची जबाबदारी घेणारा असायला नको का? पोटगी ही आयुष्य वाऱ्यावर येऊ नये यासाठी असायला हवी की आयुष्याचा स्तर वाढवण्यासाठी? मानवाच्या सहज प्रवृत्तींचा विचार करायला हवा की नको? मऊ लागले की कोपराने खणायचे हा मानवाचा स्वभाव आहे. त्याला पुरुष वा स्त्री, लहान वा मोठा, श्रीमंत वा गरीब असा अपवाद करता येत नाही. त्यातही पैसा ही अशी गोष्ट आहे की जिचा लोभ कधी कमी होत नाही आणि कितीही असला तरीही तो पुरा पडत नाही. पैशापाठी धावणे आणि पैशासाठी रडणे ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. याला अपवाद नसतात असे नाही. ते अपवाद हेच आदर्श असतात आणि असायला हवेत. पण आदर्शाचा विचार करताना जमिनीवरून पाय निसटू द्यायलाही नकोत. पण ज्याला लाभ मिळतात तो ते जास्तीत जास्त कसे लाटता येतील हेच पाहतो आणि राज्यकर्ते नावाची जमत तर कोणाला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणूच शकत नाही. त्यांना सगळ्यांनाच खुश करायचे असते. खुशामत आणि सौदेबाजीची जी पाळंमुळं पसरली आहेत, जी मानसिकता पसरली आहे; त्यावर मुलभूत आणि कायमस्वरूपी विचार आणि व्यवस्था होणे गरजेचे आहे. `आज'चा आणि `आत्ता'चा विचार करणारा मानव आहे तोवर कोणाचेच काही खरे नाही.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा