रविवार, १५ मे, २०२२

आयुर्वेद

मोठी विचित्र परिस्थिती आहे आपली. इंग्रजी राजवटीपासून आत्मनिषेधाची अशी वावटळ सुरू झाली आहे की ती थांबता थांबत नाही. आता हेच पहा ना. सध्या आरोग्य हा महत्वाचा विषय आहे. स्वाभाविकच उपचारपद्धती हाही मुद्दा येतो. पण आयुर्वेद हा टीकाविषय. का? कारण तो भारतीय आहे. भारतीयांना काही समजत होते का? शक्यच नाही. त्यामुळे त्यात अर्थ नाही. अन भारत म्हणजे काय तर ब्राम्हण. भारत म्हणजे भगवा रंग. भारत म्हणजे अध्यात्म. इत्यादी. म्हणून आयुर्वेद म्हणजे ब्राम्हणी, भगवं, ऐहिकाची उमज नसलेलं. मग भगवं वस्त्र घालणारे रामदेव बाबा ब्राम्हण नसले तरी त्यातलेच. संघात जाणारे असंख्य अब्राम्हण त्यातलेच. देवदेवता, मंदिरे, धर्मग्रंथ, संत यांचे अनुसरण करणारे अब्राम्हण असले तरी त्यातलेच. इत्यादी इत्यादी. अन आमचे अकल्याण भारताने म्हणजे ब्राह्मणांनी म्हणजे भगव्याने म्हणजे धर्माने केले. त्यामुळे ते किंवा त्यातले म्हणजे आमचे शत्रू म्हणून विरोध. मग आम्हाला प्रश्नही पडत नाही की बाबा, भगवान बुद्ध वा शिवाजी वा असं कोणतंही नाव; यांच्या काळी उपचार कसे होत असत? दुर्दैवाने छत्रपती ५० वर्षेच जगले पण आज आयुर्वेद सोडून असलेल्या उपचार पद्धतीत सुद्धा कमी वयात माणसे निरोप घेतातच. अन भगवान बुद्ध तर छान दीर्घ आयुष्य जगले. आधुनिक उपचार पद्धतींची पहाट सुद्धा व्हायची होती तेव्हाची ही गोष्ट आहे. जीवनाच्या अशा असंख्य गोष्टी आहेत. पण... द्वेष, आंधळेपणा, दुराग्रह सोडा रे मित्रांनो. मोकळ्या मनाने जगायला शिका.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा