शुक्रवार, २० मे, २०२२

सर्वांगीण

मूळ ओंकार, त्याचं सात स्वरात विभक्त होणं, पुढे तो पसारा सावरण्यासाठी २२ श्रुतीत त्याची विभागणी; अन पुन्हा विविध स्वरांचा मेळ घालीत मूळ ओंकाराकडे जाणे; म्हणजे संगीत. परंतु हे केवळ संगीताला लागू नाही, तो सृष्टीचा सनातन नियम आहे. वर्गीकरण आणि समानीकरण, पृथक्करण आणि एकीकरण, संघटन आणि विघटन, शक्तीसंचय आणि शक्तीक्षय, विश्लेषण आणि संश्लेषण; या आणि यासारख्या क्रिया सतत सुरू असतात. तोच सृष्टीचा आधार आहे. दुर्दैवाने १९ व्या शतकापर्यंतचे विज्ञान आणि त्याला आधार बनवून जगभर झालेले प्रबोधन यांनी वर्गीकरण, पृथक्करण, विश्लेषण यांनाच उचलून धरले. अणूच्या आंतररचनेपासून जीवनाच्या हेतूपर्यंत भेदांचीच मांडणी केली. ती चूक नाही पण भेदांचा पुन्हा मेळ घालायचा असतो हा सृष्टीचा नियम त्याने अडगळीत टाकला. यातून दोन प्रवृत्ती उदयास आल्या - पृथकता नाकारणे आणि पृथकताच सत्य मानणे. एकच काहीतरी सत्य असू शकते, एकच काहीतरी कारण असू शकते, एकच काहीतरी आधार असू शकतो, एकच काहीतरी अर्थ असू शकतो; यासारख्या एकांगी वृत्तीचे अमाप पीक आले. आज त्याचाच धुडगूस सर्वकाली, सर्वदेशी, सर्वलोकी, सर्वत्र पाहायला मिळतो. कायद्यापासून  नितीपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत,  बाल संगोपनापासून विज्ञानापर्यंत, कृषीपासून तत्वज्ञानापर्यंत. २० व्या शतकातील विज्ञानाने कूस पालटली असली आणि एकांगी, एकसुरी, एकरेशीय दृष्टी मोडीत काढली असली तरीही त्याला वैज्ञानिक दृष्टी म्हणून मान्यता मिळालेली नाही आणि नवीन अनेकांगी दृष्टी विकसित करणारे जीवनव्यापी प्रबोधनही झालेले नाही. अगदी अत्याधुनिक समजले जाणारे विचार सुद्धा आत्यंतिक एकांगीपणाने ग्रस्त आहेत. विचारपद्धती, विचारक्षमता, दिशा या सऱ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यात बदल करण्यासाठी वैज्ञानिकता याऐवजी सर्वांगीण किंवा सर्वांकष असा शब्दप्रयोग हे पहिले पाऊल म्हणून उचलायला हवे.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा