मंगळवार, २४ मे, २०२२

रामायण आणि प्रतिसृष्टी

वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकी होणे हा भारताचा जगाला संदेश आहे. त्यांनी जगाला रामायण दिले. दुसरे ऋषी विश्वामित्र. यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. यातील रामायण कालजयी ठरले. आजही त्याची ओढ अन त्यातील तत्वांचे अन मूल्यांचे आवाहन कायम आहे. प्रतिसृष्टी मात्र फक्त पुराणकथेत उरली आहे.

आजही रामायण आणि प्रतिसृष्टी हे दोन्ही प्रवाह आहेतच. पैसा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, पौरुष, सत्ता यांच्या भरवशावर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न, संकल्प आहेतच. अन दुसरीकडे या सगळ्याच्या मर्यादा सांगणारी `रामायणी वृत्ती'ही आहे. नराचा नारायण झालेल्या महर्षींनी केलेल्या दोन महान कार्यांपैकी काय टिकले हे जग पाहतं आहे. आज तर नारायणाचा नर होण्याची घोडदौड सुरु आहे, अन त्याच वेळी प्रतिसृष्टीची मनोरथेही. काळाचा फैसला मोठा छान असेल. पण आपण तो फैसला ऐकण्यासाठी राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा