शुक्रवार, २७ मे, २०२२

एक पाऊल पुढे...

आज सकाळी एका मुख्याध्यापक मित्राचा भ्रमणध्वनी आला. बाकी बोलता बोलता त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला- `आमच्या शाळेतील एक शिक्षिका विदेशात फिरायला जाणार आहेत. पाच लाख रुपये खर्च करणार आहेत. मी (म्हणजे मुख्याध्यापक) त्यांना म्हटले, छान आहे. आम्हाला आनंद आहे. आम्ही तुम्हाला विमानतळावर सोडायला येऊ. पुष्पगुच्छ आणू. या आनंदाच्या क्षणी मी तुम्हाला एक विनंतीही करतो. आपण शाळेसाठी २५ हजार रुपये द्या. मी अन्य लोकांकडूनही काही रक्कम जमवतो. आपण त्यातून शाळेची रंगरंगोटी करू.' मित्राने सांगितले, त्या शिक्षिका नाही म्हणाल्या. माझ्या पैशावर माझा अधिकार आहे म्हणाल्या. मग मित्र त्याचे म्हणणे सांगू लागला- `ज्या शाळेकडून त्यांना सगळं काही मिळालं. त्यांचं आयुष्य, त्यांचं घरदार, त्यांचं विदेश फिरून येणं; वगैरे होते आहे, त्या शाळेसाठी एखादा पगार देण्याची मात्र त्यांची तयारी नाही. त्या शिक्षिका आरक्षित वर्गातील आहेत. हुशारही आहेत. आमची शाळा जुनी आहे. बहुतेक आर्थिक, सामाजिक मागास वर्गातीलच विद्यार्थी आहेत. आजकाल शाळांची स्थिती मोठी बिकट आहे. त्यात ज्यांनी सहजपणे जाणीवपूर्वक सहकार्य करायला पाहिजे त्यांची मानसिकता फार वेगळी आहे.' मुख्याध्यापक असलेला हा मित्र स्वत: आदिवासी आहे.

त्याचा किस्सा आणि त्याची व्यथा ऐकल्यावर सहज मनात आलं- आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे टाकायला हवं आहे. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात अनेक जण चांगला जम बसवताहेत. स्वत:च्या कष्टाने, परिश्रमाने अनेक गोष्टी साध्य करताहेत. अनेकांना आरक्षणाचा (केवळ जातीचे नव्हे, वर्गाचे, महिलांचे असेही) लाभही होतो आहे. त्याला हरकत नाही. पण एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर आपण त्याच्या उत्कृष्टतेकडे, अचूकतेकडे, तत्परतेकडे गेले पाहिजे याचा आग्रह दिसत नाही. जसे- शिक्षक म्हणून लागल्यावर विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान, कौशल्य देण्याचा, संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न वगैरे. जसे- सरकारी नोकरी लागली असेल तर आपल्याकडील फाईल्स लवकर हातावेगळ्या करणे, कार्यालयात कामासाठी आलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवून त्याचे काम अडवून न ठेवता लवकर करून देणे, सौजन्याने वागणे वगैरे. अशा अनेक गोष्टी. व्यक्तिगत पातळीवर एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर बाकीच्यांचे जीवन सुखी सुरळीत व्हावे, चांगले वातावरण तयार व्हावे, अनेक संस्था, चळवळी सशक्त व्हाव्या; इत्यादीसाठी `मी काही करू शकतो का?' हा विचार करून एक पाऊल पुढे टाकले तर !!

- श्रीपाद कोठे

२८ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा