मंगळवार, ३१ मे, २०२२

ओवैसीच्या युक्तिवादाच्या निमित्ताने

गोहत्या बंदीला विरोध करताना खा. असदुद्दिन ओवैसी अनेक मुद्दे मांडत होते. त्यातला एक मुद्दा होता- आमच्या खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आम्ही का बदलाव्यात? वरवर बिनतोड वाटणारा हा बुद्धिवादी युक्तिवाद तद्दन तकलादू आहे. खाण्यापिण्याच्याच नव्हे तर अनेक सवयी, आवडीनिवडी जगभरातील मनुष्यप्राणी सतत बदलत आला आहे. गायीचेच कशाला नरमांसभक्षण करणारेही अनेक जण पूर्वी होते. आजही थोडेच का होईना आहेत. ती सवय माणसाने बदललीच ना? पूर्वीचा मानव मृगयाजीवी होता. आज अनेक देशांमध्ये अनेक गोष्टींच्या शिकारीवर बंदी आहे. मृगयाजीवीतून उत्क्रांत होत आजचा मानव आकाराला आला आहे. चोरी हाच पिढीजात व्यवसाय असलेले लोक होते. म्हणून चोरीचे समर्थन करून ती अधिकृत व्यवसायाच्या यादीत टाकायची का? पूर्वी माणूस कपडे घालत नव्हता, आताही तसेच करावे का? खाणे, पिणे, राहणे, वागणे, बोलणे, चालणे, अशा अनेक सवयी आणि आवडीनिवडी सतत बदलत असतात. गरजा, उपलब्धता, संवेदनशीलता, आदर, प्रेम, सहअस्तित्वाची गरज, जाणिवांचा स्तर उंचावणे अशा अनेक कारणांनी हे होत असते. असे बदल करण्यास हट्टाने नकार देणे हीच कट्टरवादाची सुरुवात असते. आज संपूर्ण जगात मुसलमानांची किंवा इस्लाम मानणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामागे इष्ट बदल न करण्याची त्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. खा. ओवैसी त्यांचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हणावे लागेल. अन प्रसार माध्यमे अशा वृत्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणता खतपाणी घालत असतात असाही निष्कर्ष काढावा लागेल. अन्यथा, शेकडो गायींच्या गोशाळा चालवणाऱ्या मुसलमानांच्या मुलाखती प्रसार माध्यमांनी दाखवल्या नसत्या का? मुलाखती जाऊ द्या, त्यांच्या कामाची माहिती एक बातमी म्हणून तरी कधी या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे का? गोंधळ माजवून बुद्धिभ्रम उत्पन्न करण्याच्या सध्याच्या शर्यतीत तारतम्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सामान्य माणसाचीच अधिक आहे.

- श्रीपाद कोठे

१ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा