मंगळवार, ३१ मे, २०२२

उपद्व्याप

परम आदरणीय कुमार केतकर यांचा एक व्हिडीओ पाहण्यात आला. `स्वत:चं लग्न लपवणारा खोटारडा पंतप्रधान आपल्याला हवा का?' असा रोकडा सवाल त्यांचा आहे. अहो महाशय, लग्न लपवलं असतं तर, उमेदवारी अर्जात उल्लेख केला असता का? बोलता येतं म्हणून काहीही बोलायचं का? विवाह हा अतिशय खाजगी मुद्दा आहे. दोन व्यक्तींचं परस्पर understanding हाच महत्वाचा भाग. लिव्ह इन (लग्न न करता एकत्र राहणे) हाही विवाहाचा एक प्रकार. तसंच लिव्ह आउट (लग्न करूनही वेगळे राहणे). त्या बिचाऱ्या यशोदा बेन काही म्हणत नाहीत अन तुम्हाला का हो उठाठेव?

एक जुना प्रसंग आठवला.

सज्जनगडावर मुक्कामाला होतो. शेजारच्या खोलीत चार पाच तरुण मुलं मुक्कामी होती. सकाळी आंघोळ वगैरे उरकून प्रसन्न वातावरणात खोलीसमोर उभा होतो. शेजारच्या खोलीतला एक मुलगा आला. कोण, कुठले गप्पा झाल्या. हळूच त्याने विचारले - तुम्हाला blanket दिलं होतं का रात्री? मला काही कळलंच नाही. म्हटलं- `नाही बुवा का? त्यांनी दिलं नाही पण मला गरजही नव्हती. जे पांघरूण होतं तेच जास्त होतं. तेवढंही लागलं नाही.' त्याने विषय पुढे रेटला. म्हणाला- तो दक्षिणी लोकांचा जो गट रात्री मुक्कामाला आला ना त्यांना या लोकांनी blanket दिले पुष्कळ. मी म्हणालो- `बरं. त्यांनी मागितले असतील. यांनी दिले असतील. त्याचं काय?' तो अस्वस्थ होत होता. म्हणाला- `तसं नाही. हे व्यवस्थापक लोक बदमाश असतात. त्या लोकांनी पैसे दिले असतील. अन तसंही कोणाकडे लक्ष द्यायचं अन कोणाकडे दुर्लक्ष करायचं हे यांचं ठरलेलं असतं.' मी म्हणालो- `अरे बाबा. असेलही तसं कदाचित. पण त्याचा माझ्याशी किंवा तुझ्याशी काय संबंध? का त्रागा करतोय? अन माझी प्रसन्न सकाळ का बिघडवतोय?' त्यावर तो मोकळा झाला- `हेच चुकतं तुम्हा लोकांचं. हा अन्याय आहे. सगळ्यांना समान न्याय हवा ना? त्यांना blanket दिले तर तुम्हालाही द्यायला हवे होते. तुम्ही लोक काही बोलत नाही. भांडत नाही. दुर्लक्ष करता म्हणूनच फावतं यांचं.' मी म्हटलं- `अरे काय बोलतो तू? मला गरजच नव्हती. मी एका शब्दाने त्यांना काही मागितले नाही. त्यांनी नकार देण्याचा किंवा पक्षपात करण्याचा प्रश्नच कुठे येतो? शिवाय ती दक्षिणी मंडळी संख्येने खूप आहेत. पांघरुणे कमी पडली असतील.' वगैरे वगैरे. दहा एक मिनिटे वाद झाला. अखेर मी म्हणालो- `सोड आता. मला त्यात रस नाही. तुम्ही कसे काय आलात?' तेव्हा तो क्रांतिकारक बोलला- `आम्ही मोटर सायकलने फिरायला निघालो आहोत. आमची गाडी झाली खराब. आता काय करायचे? म्हणून इथे आलो मुक्कामी.' म्हणजे राहणे, जेवणखाण यासाठी त्यांना रामदास स्वामी, ब्राम्हण, हिंदू, धर्म इत्यादी गोष्टी चालतात. त्यांची सगळी व्यवस्था, तीही फुकटात करताना कोणीही त्यांना जातपात, राजकीय मते, विचारधारा आदी विचारत नाही. तरीही त्यांच्या मनातील आकस कणभर कमी होत नाही. एवढेच नाही तर नसलेले मुद्दे काढून भांडणे लावता येतील का याचा उपद्व्याप सतत त्यांच्या डोक्यात सुरु असतो.

कुमार केतकर यांच्यापासून, कुठल्या तरी पुरोगामी प्रगतीशील आदी विचारांच्या फुटकळ संघटनेचे टीनपट तरुण; छोट्या वा मोठ्या वर्तुळात; सारख्याच खुटीउपाड मानसिकतेचे. सतत जळत्या काड्या फेकणारे.

- श्रीपाद कोठे

१ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा