शुक्रवार, २० मे, २०२२

झाडे आख्यान

- खूप झाडे लावली पाहिजेत.

- झाडे लावा झाडे.

- ही जागा रिकामीच आहे ना, इथे झाड लावून टाका.

- रिकाम्या जागा झाडांनी भरा.

- काय तुम्ही झाडांचे शत्रू...

- किती रखरखीत आहे इथे, झाडे का लावत नाही.

- झाडांशिवाय जगणं हे पाप आहे.

- जितकी माणसे तितकी झाडे.

- घराचं सौंदर्य महत्वाचं आहे, पण झाडे त्याहून जास्त महत्वाची आहेत.

- झाडांशी शत्रुत्व करून इमारतींचं सौंदर्य वाढवलं तर, आपलं आणि जगाचं सौंदर्य कोमेजून जाईल.

- झाडांसाठी एखाद्याशी भांडण करायलाही हरकत नाही.

- सगळ्यांशी गोड बोलावेच, पण झाडांच्या शत्रूंशी तिखट आणि कडू बोलायला हरकत नाही.

- आपसात खूप काही निरर्थक बोलण्यापेक्षा थोडे झाडांशीही बोलावे.

- आपला स्वार्थ म्हणून तरी झाडे लावा, जगवा, वाढवा, जोपासा.

- झाडांशी शत्रुत्व म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे.

- झाडांचे महत्व न कळणाऱ्याला स्वार्थसुद्धा कळत नाही, असेच म्हणावे लागेल.

ही आणि यासारखी वाक्ये आपल्या रोजच्या बोलण्यात, व्यवहारात यायला हवीत. त्यातून एक सकारात्मक वातावरण नक्कीच तयार होईल. अन्य टिवल्या बावल्या फक्त १% कमी करून तो वेळ, ती उर्जा, तो उत्साह, ती सक्रियता झाडे (वृक्ष या अर्थाने. बाल्कनीत एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं दुर्लक्षित तुळशीचं रोपटं या अर्थाने नव्हे.) या विषयाकडे लावली तरी परिस्थितीत खूप फरक पडेल. सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकेल. पण हा सगळा सवयीचा भाग असतो. चित्रपट आणि क्रिकेट सारख्या कंटाळवाण्या गोष्टी आपण आवडीने चघळतोच ना !!!

शांघाय शहराची चर्चा आपल्या येथे जुनी आहे. पंतप्रधान मोदी तेथे गेल्याने तिला पुन्हा उजाळा मिळाला. तेथील वर्णनात्मक माहितीपट पाहताना जाणवला तो तेथील झाडांचा अभाव. आम्हाला अशी शहरे नको, असे मोदींना सांगण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मोदींमुळे स्वच्छता या विषयालाही चांगले दिवस आले आहेत आणि ते चांगलेच आहे. पण स्वच्छता ही निसर्ग, झाडे, माती, पशू पक्षी यांच्याशी विरोधी स्वरुपात पाहिली व आचरली जाऊ नये.

झाडांचे प्रेम आम्हालाही आहे, पण त्यासाठी जंगले वाढवा. झाडांची ब्याद शहरात, घरांजवळ आणि आपल्या रोजच्या जगण्यात नको; ही भूमिकाही टाकून द्यायला हवी. झाडांची, निसर्गाची, मातीची, पशू पक्ष्यांची जवळीक वाढली तर माणसातली पशू वृत्ती, स्वार्थी वृत्ती हळूहळू आपोआप कमी होते हेही लक्षात ठेवायला हवे. प्रदूषण दूर करण्यासोबतच माणसाला माणूसपण मिळवून देण्यात निसर्गाचा वाटा असतो. त्याकडे डोळेझाक नको.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा