सोमवार, ९ मे, २०२२

आईनस्टाईनच नव्हे, भारतातही...

सलमानवरील एका चर्चेत, मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना; न्या. वळसे पाटील यांनी एक छान मुद्दा मांडला. ते म्हणाले- नीती वगैरे आता राहिली नाही. नीती काय असते, कशी रुजते याबद्दल ते म्हणाले- आईनस्टाईन रोज जेवताना विचार करीत असे की मी आज जे जेवणार आहे त्यामागे किती हात राबले आहेत, किती जणांनी घाम गाळला आहे, इत्यादी. अतिशय छान आणि अनुकरणीय अशीच ही गोष्ट आहे.

यानिमित्ताने एका गोष्टीची मात्र नोंद करावीशी वाटते. न्या. पाटील यांनी सांगितलेली ही भूमिका किमान आपल्या देशाला नवीन नाही. भोजनापूर्वी म्हटली जाणारी प्रार्थना, हा प्रकार अगदी वेदकाळापासून आपल्या देशात रूढ आहे. रा.स्व. संघाच्या किंवा राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमांमध्ये जेथे भोजन असेल तेथे हा प्रकार असतोच. संघाशी वगैरे काहीही संबंध नसलेले लाखो लोकसुद्धा (अगदी खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत) हा भाव व्यक्त करतात. परंतु आज त्याकडे तुच्छतेच्या दृष्टीने पाहिले जाते. संघातील या प्रकाराला तर `ब्राम्हणी पद्धत' वगैरे हिणवणारे महाभाग आहेत. कुसुमाग्रजांची एक कविता आहे `अग्निपुत्र' शीर्षकाची. त्यात तर केवळ भोजन नव्हे तर संपूर्ण जीवन आणि एक जीवन नव्हे तर संपूर्ण मानवी इतिहासाला लागू होईल असा कृतज्ञता भाव व्यक्त झाला आहे.

न्या. पाटील यांनी आईनस्टाईनचे उदाहरण दिले याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. पण आपल्या येथील जे काही चांगले, अनुकरणीय आहे ते त्याज्य, हीन असल्याचा समज बाळगून त्याकडे दुर्लक्ष करणारी एक वृत्ती आपल्याच देशात मोठ्या प्रमाणात आहे. ही वृत्ती टाकून देण्याची गरज आहे. आत्महीनतेची वृत्ती आणि त्यातही जाणूनबुजून तसे करण्याची वृत्ती, त्यामागील द्वेषभावना या गोष्टी असू नये एवढेच. न्या. पाटील हेदेखील संघ, या देशातील परंपरा वगैरेबद्दल फारशी आस्था ठेवणारे म्हणून परिचित नाहीत. या निमित्ताने त्यांनाही प्रार्थना की आपल्या मनात असलेले गैरसमज वगैरे काढून टाकावे. ज्या गोष्टी चांगल्या, अनुकरणीय आहेत; त्या तशाच असणार. त्यात भेद करू नये.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १० मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा